दिवाळीनंतरच्या सुट्टीचा आनंद घेण्यासाठी अत्रिनंदन सकाळीच दोन मित्रांसह घराजवळच्या डोंगरावर गेला होता. पावसाने हिरवाई झाकलेल्या डोंगरावर तिघेही मस्ती, गप्पा आणि खेळात रमले होते. मात्र निसर्गाने काही वेगळंच ठरवलं होतं. एका दगडावर बसलेला अत्रिनंदन अचानक खाली कोसळला. पावसामुळे दगडाखालची माती सैल झाल्याने तो मोठा दगड घरंगळत खाली गेला आणि त्याच्याखाली अत्रिनंदन चिरडला गेला. त्याच क्षणी बाकीचे दोन्ही मित्रही बाजूला फेकले गेले आणि जखमी झाले.
advertisement
अत्रिनंदनच्या अंगावरून दगड गेल्याने तो गंभीर जखमी झाला होता. रक्तबंबाळ अवस्थेत पडलेला अत्रिनंदन पाहून त्याच्या मित्रांनी आरडाओरड करत गावात मदत मागितली. काही गावकरी धावतच घटनास्थळी पोहोचले. सर्वांनी मिळून दगड हटवून अत्रिनंदनला बाहेर काढलं आणि तात्काळ रुग्णालयात दाखल केलं. मात्र संभाजीनगर येथे उपचार सुरू असतानाच आज पहाटेच्या सुमारास त्याने प्राण सोडले.
दिवाळी सुट्ट्यांच्या उत्साहात बुडालेल्या गावात अचानक शोककळा पसरली. सुट्टीच्या दिवशी मित्रांसोबत फिरायला गेलेला १३ वर्षीय अत्रिनंदन घरी परतलाच नाही. डोंगरावर फिरायला गेलेल्या या निरागस मुलाचा दगडाखाली दबून मृत्यू झाल्याने संपूर्ण आळंद हादरलं.
अत्रिनंदनच्या मृत्यूची बातमी गावात पोहोचताच शोककळा पसरली. आई-वडिलांचा आक्रोश हृदय पिळवटून टाकणारा होता. अत्रिनंदन आपल्यात नाही हे कळताच आईने हंबरडा फोडला. वडीलही कोलमडून गेले. गावातील लोक, शिक्षक, शेजारी सगळेच या घटनेने स्तब्ध झाले आहेत. अत्रिनंदनवर शुक्रवारी दुपारी अंत्यसंस्कार करण्यात आले. त्याच्या पश्चात आई वडील आणि त्याचा भाऊ असं कुटूंब आहे.
