पुण्यातील कथित जमीन घोटाळ्यावरून पार्थ अजित पवार यांच्यावर गंभीर आरोप झाले. महार वतनाची जमिनाची विक्री होत नसताना पार्थ पवार यांनी खरेदीचा व्यवहार कसा केला. त्याउपरही मुद्रांक शुल्क विभागाने २१ कोटींचे शुल्क माफ कसे केले? असे सवाल विचारून विरोधकांनी पार्थ पवार यांना घेरत अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. या प्रकरणात सामाजिक कार्यकर्त्या अंजली दमानिया यांनी उडी घेऊन अजित पवार यांच्या राजीनाम्याची मागणी केली. विशेष म्हणजे अजित पवार यांच्यावर सिंचन घोटाळ्यातले आरोप करण्यात अंजली दमानिया देखील होत्या. आता पार्थ पवार यांच्या संबंधित प्रकरणात राजीनामा मागून दमानिया यांनी अजित पवार यांच्याविरोधात मोर्चा उघडला आहे.
advertisement
जिल्हाधिकाऱ्यांवर निलंबनाची कारवाई करा
पुण्याचे पालकमंत्री अजित पवार असताना जमीन घोटाळ्याची चौकशी नीट होऊ शकेल का? शीतल तेजवानी जिल्हाधिकाऱ्यांना पत्र पाठवते पण जिल्हाधिकारी कारवाई करत नाही. खरे तर राज्य सरकारने त्यांच्यावर कारवाई करावी, अशी मागणी दमानिया यांनी केली. तसेच या संपूर्ण प्रकरणात पॉवर ऑफ अॅटर्नीची नोंद नव्हती, व्यवहार करताना असावी लागते, याकडे दमानिया यांनी लक्ष वेधले.
तो व्यवहार रद्द करणारे अजित पवार कोण?
कुठलाही व्यवहार रद्द करताना विक्री आणि घेणारा तो व्यवहार रद्द करू शकतो. शीतल तेजवानीला गायकवाड कुटुंबाकडून खरेदी किंवा विक्रीचे अधिकार नाहीत. जमीन खरेदीचा करार पार्थ पवार किंवा शीतल तेजवानी रद्द करू शकत नाहीत. व्यवहार रद्द करण्यासाठी दिवाणी न्यायालयात जावेच लागेल, असेही दमानिया म्हणाल्या.
पार्थ पवार यांना ७ ते १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते
एखाद्याने जर जाणून बुजून घोटाळा केला असेल तर तो करार रद्द करण्याचा अधिकार त्याला नाही. अधिकाऱ्यांनी घोटाळा केला असेल तर तुरुंगवास होऊ शकतो. खोटी कागदपत्र सादर केली किंवा खोट्या व्यक्तींना उभं केलं तर ७ वर्षांची शिक्षा होते. जर पार्थ पवार म्हणाले असते की करारा संदर्भात मला माहिती नव्हते तरच एकटे दिग्विजय पाटील अडकले असते. मात्र पार्थ पवार यांनी दिग्विजय यांना सगळे अधिकार दिले होते. पार्थ पवार कंपनीत ९९% भागीदार आहेत. हा व्यवहार होतोय हे पार्थ पवार यांना माहित होतं. त्यांना शिक्षा भोगावीच लागेल. या घोटाळ्यात ७ ते १४ वर्षांची शिक्षा होऊ शकते.
पवारांच्या एकूण ६९ कंपन्या, त्याच्यावर सिरीज करणार, संपूर्ण पवार कुटुंब दमानिया यांच्या रडारवर
अजित पवार यांच्या कुटुंबाच्या एकूण ६९ कंपन्या आहेत, मी सगळ्याचा अभ्यास करणार आहे. सुनेत्रा पवार, पार्थ पवार, जय पवार यांच्या कंपन्यांसंदर्भात खुलासा करणार आहे, असे सांगून संपूर्ण पवार कुटुंबच रडारवर असल्याचे दमानिया यांनी अप्रत्यक्षपणे सांगितले. सिंचन घोटाळा सिद्ध झाला होता पण फडणवीस मित्र झाले आणि तुम्ही वाचले, असा टोलाही दमानिया यांनी अजित पवार यांना लगावला.
