गेले काही दिवस धनंजय मुंडे हे प्रकृतीच्या कारणास्तव सक्रिय नव्हते परंतु आता धनंजय मुंडे यांनी जनता दरबार घेत परळीतील जनतेच्या समस्या मार्गी लावल्याचे दिसत आहे. धनंजय मुंडे यांचे परळी येथील जगमित्र संपर्क कार्यालय चोवीस तास कार्यकर्ते व समर्थकांच्या गर्दीने गजबजून गेलेले असायचे मात्र सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येनंतर कार्यालय ओस पडले होते. कारण याच कार्यालयातून वाल्मिक कराडने खंडणी मागितली होती.
advertisement
जगमित्र कार्यालय खंडणीकेंद्र
धनंजय मुंडे यांचे परळी शहरातील जगमित्र कार्यालय हे नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठीचे जनसंपर्क कार्यालय होते. मात्र धनंजय मुंडे यांचा अत्यंत जवळचा आणि विश्वासू समजले जाणारा खंडणीखोर वाल्मिक कराड हा आपला काळा कारभार याच कार्यालयातून चालवायचा हे संतोष देशमुख देशमुख हत्या प्रकरणाच्या चार्जशीटमधून समोर आले आहे. वाल्मिक दिवसभर या कार्यालात बसून ते जिल्हाभरातील यंत्रणा हलवत होता, त्यामुळे जगमित्र कार्यालय हे जणू खंडणी केंद्र तयार झाले होते.
चार महिन्यांनी धनंजय मुंडेंचा कमबॅक
दरम्यान, मस्साजोगचे सरपंच संतोष देशमुख यांच्या हत्येचा मास्टरमाईंड कराड असल्याचे समोर आले. त्यानंतर धनंजय मुंडेंनी आपला राजीनामा दिला. दरम्यान या काळात जगमित्र कार्यालय ओस पडले होते. नागरिकांचेही येणे-जाणे बंद झाले होते. शहरातही राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांचा वावर कमी झाला होता, मात्र आता अखेर चार महिन्यांनी धनंजय मुंडे स्वत: उपस्थित राहत त्यांनी लोकांच्या समस्या सोडवण्यासाठी जनता दरबार भरवला.
