धुळे : धुळे जिल्ह्यातील पिंपळनेर शहरात लग्न मंडपात झालेल्या तिहेरी हत्याकांड प्रकरणात पिंपळनेर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलिसांनी चार संशयितना अटक केली आहे. पिंपळनेर शहरातील गोसावी समाजातील एका लग्न सोहळ्यातील साखरपुड्याच्या कार्यक्रमात झालेल्या वादात तीन जणांची हत्या करण्यात आली आहे.
साक्री तालुक्यातील पिंपळनेर शहरातील बिजासनी कॉलनीत राहणाऱ्या विजय गोसावी यांच्या मुलीचा विवाह सोहळा होता. या लग्न सोहळ्यासाठी गुजरात राज्यातील सोनगड येथील वरमंडळी पिंपळनेर येथे आले होते. विवाह सोहळ्याच्या दोन दिवस आधीच सोनगडच्या काही लोकांनी त्यांच्या मोबाईलवर चिथावणीखोर स्टेटस ठेवल्याने दोन्ही बाजूने अंतर्गत धुसफूस सुरु होती.
advertisement
नेमकं कारण आलं समोर
लग्न पत्रिकेत सोनगड (गुजरात) येथील गोसावी समाजातील लोकांची नावे का नमूद केली नाहीत, यावरून सोनगड येथे काही महिन्यांपूर्वी वाद निर्माण झाला होता. तसेच गोसावी समाजातील लग्न समारंभ व इतर सामाजिक कार्यक्रमांमध्ये वर्चस्व कोणाचे असावे, यावरून सोनगड व पिंपळनेर येथील गोसावी समाजातील व्यक्तींमध्ये मतभेद सुरू होते. या वादातून ही घटना घडल्याची माहिती समोर आली आहे.
स्टेटसचा जाब विचारण्यासाठी गेले अन् अनर्थ घडला
दरम्यान हळदीच्या दिवशी सेाहळा सुरु होण्याआधी या स्टेटसचा जाब विचारण्यासाठी गेले असता दोन्ही गटात वाद झाला. यावेळी अचानकपणे तीन ते चार जणांनी वधुकडील लोकांवर चाकूने वार केले. या चाकू हल्ल्यात सुरेशगिरी गोवासी (वय 50), साहिल गोसावी (वय 30), देवेंद्र ज्ञानेश्वर पवार (वय 30) हे तिघे जागीच ठार झाले, तर दोन जण गंभीर जखमी झालेत.
लग्नघराच्या अंगणातच मोठी खळबळ
दरम्यान, घटनेनंतर आरोपी हे गुजरात राज्याकडे पळून जात असतानाच पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने गुजरातकडे जाणार्या मार्गावर नाकाबंदी करुन कांतीलाल गोसावी, जसवंत गोसावी व महेंद्र गोसावी यांना ताब्यात घेतले. तर चितावणीखोर स्टेटस ठेवणाऱ्या अनिल गोसावी याला पिंपळनेर पोलिसांच्या पथकाने सोनगड येथून अटक केली आहे. एन लग्नघराच्या अंगणातच घडलेल्या या रक्तरंजित घटनेने जिल्ह्यात मोठी खळबळ उडाली असून पोलीस या घटनेचा अधिक तपास करत आहेत.
हे ही वाचा :
