पुणे जिल्ह्याच्या उत्तर भागात जुन्नर, आंबेगाव, शिरूर आणि खेड परिसरात बिबट्याच्या दहशतीने ग्रामस्थ भयभीत झाले आहेत. शेतीच्या हंगामामुळे शेतात काम करताना बिबट्याचे हल्ले होत आहेत. मागच्या काही वर्षांमध्ये बिबट्याच्या संख्येत लक्षणीय वाढ झालीये. बिबट्याच्या हल्ल्यामुळे जनावरांच्या सुरक्षेसाठी इथल्या नागरिकांना रात्र जागून काढावी लागत आहे. याच पार्श्वभूमीवर
स्थानिकांनी प्रशासनाविरोधात उग्र आंदोलन छेडले. बुधवारी वनमंत्री गणेश नाईक यांनी उत्तर भागातील गावांना भेटी दिल्या.
advertisement
हा दोष कुणाचा? वनमंत्री नाईक हतबल
गणेश नाईक म्हणाले, मी मंत्री म्हणून नाही तर माणूस म्हणून इथे आलो आहे. प्रशासनाने आंदोलनातील गुन्ह्यांवर कारवाई करू नये. इथल्या शेतकऱ्यांनी शेतात ऊस लावला आहे. ऊसात ससे, लांडगे, कोल्हे असल्याने बिबट्याला आयती शिकार मिळते. हा दोष कुणाचा? अशी हतबलता वनमंत्री नाईक यांनी व्यक्त केली.
हिंसक बिबट लोकांसमोर येत असेल तर त्याला गोळ्या घाला
उत्तर पुणे जिल्ह्यात ही परिस्थिती सर्व ठिकाणी उद्भवली आहे. पण यातून मार्ग काढण्यासाठी प्रयत्न करणार असून हिंसक बिबट लोकांसमोर येत असेल तर त्याला गोळ्या घाला, अशी आक्रमक भूमिका वनमंत्री गणेश नाईकांनी घेतली. वनमंत्री गणेश नाईक यांनी पिंपरखेड येथे बिबट्याच्या हल्ल्यात मृत्यू झालेल्या कुटुंबियांची भेट घेतली. यावेळी नाईक यांनी माध्यमांशी संवाद साधला.
