गेल्या १८ वर्षांपासून उरण तालुक्यातील जासई येथील शंकर मंदिर येथून आळंदीपर्यंत पायी दिंडीचे आयोजन केले जाते. या दिंडीत उरणसह पनवेल परिसरातील अनेक लोक सहभागी होत असतात. यंदाही ७ नोव्हेंबर ते १३ नोव्हेंबर या कालावधीत दिंडीचं आयोजन करण्यात आलं होतं, ज्यात उरण आणि परिसरातील जासई, करळ, कामोठे, पारगावसह इतर गावांतील सुमारे १५० भाविक सहभागी झाले होते.
advertisement
अपघाताची दुर्दैवी घटना
मंगळवारी रात्री कामशेत येथील काळभैरव मंदिर येथे मुक्काम करून, बुधवारी सकाळी ५.४५ वाजता ही दिंडी इंदुरीच्या दिशेने पुढे निघाली. काही अंतर पुढे गेल्यावर एका भरधाव कंटेनरने दिंडीतील भाविकांना जोरदार धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, त्यात उरण तालुक्यातील करळ येथील रहिवासी असलेल्या मंजुळा तांडेल यांचा जागीच मृत्यू झाला.
या अपघातात मंजुळा तांडेल यांच्यासह अन्य १० भाविक जखमी झाले आहेत. जखमींपैकी दोन महिला गंभीर जखमी असून त्यांच्यावर रुग्णालयात अतिदक्षता विभागात (ICU) उपचार सुरू आहेत. या दुर्दैवी अपघातात मंजुळा तांडेल यांची बहीण अपर्णा ठाकूर यांनाही फ्रॅक्चर झाले आहे. तर अन्य एक भाविकाचा उपचारादरम्यान मृत्यू झाल्याची माहिती आहे.
दोन दिवसांपूर्वी कीर्तन सेवा केली
मंजुळा तांडेल या गेल्या तीन वर्षांपासून या दिंडीमध्ये कीर्तन सेवा देत होत्या, तर त्या सुमारे सहा वर्षांपासून प्रवचन करीत होत्या. दोन दिवसांपूर्वीच त्यांनी कीर्तन सेवा केली होती, असे आयोजक धर्मा पाटील यांनी सांगितले. मंजुळा तांडेल यांच्या पश्चात त्यांचे पती, मुलगा हितेंद्र आणि दोन विवाहित मुली असा परिवार आहे.
