खरं तर आत्महत्या केलेल्या तरुणीच्या चितेची राखही थंड झाली नाही तोच तिच्या चारित्र्यावर सवाल उपस्थित केले जात आहे. त्याहून वेदनादायी बाब म्हणजे ज्या सरकारकडून त्या पीडित कुटुंबाला न्यायाची अपेक्षा आहे त्याच सरकारमधील मंत्र्याने प्रकरणाचे वास्तव फार वेगळे असल्याचे सांगत तरुणीच्या चारित्र्याकडे बोट दाखवलंय.
ऐन भाऊबीजेच्या दिवशी बीड जिल्ह्यातील रहिवासी असलेल्या डॉक्टर तरुणीनं आत्महत्या केली. मृत्यूला कवटाळण्यापूर्वी तिनं हे टोकाचं पाऊल का उचललं हे तळहातावर लिहून ठेवलं होतं. माझ्या मरणाचे कारण पोलीस निरीक्षक गोपाळ बदने, ज्याने माझ्यावर 4 वेळा बलात्कार केला आणि प्रशांत बनकर ज्याने मागचे 4 महिने शारीरिक आणि मानसिक छळ केला, असा आरोप तिने केला.
advertisement
या प्रकरणी गोपाळ बदने आणि प्रशांत बनकर या दोन आरोपींना अटक करण्यात आलीय. फलटणमधील डॉक्टर महिलेच्या आत्महत्येवरून राजकारण पेटलं असून आरोप प्रत्यारोपांच्या फैरी सुरू आहेत. अशातच जयकुमार गोरे यांनी आत्महत्या केलेली महिला डॉक्टर आणि आरोपींमधील मोबाईल चॅटचा उल्लेख करत या प्रकरणात मोठा दावा केलाय.
महिला डॉक्टरने आत्महत्या केल्यानंतर दोनही आरोपींना अटक करण्यात आली आहे. त्यांचे मोबाईल जप्त करण्यात आले आहेत. तिघांच्या मोबाईल चॅटींगमध्ये एक वेगळाच ट्रँगल असल्याचे वक्तव्य भाजपचे नेते आणि मंत्री जयकुमार गोरे यांनी केले आहे. या प्रकरणाच्या सखोल चौकशीतून सत्य समोर येईल असंही गोरे यांनी म्हटलंय. या प्रकरणात काही लोकं आपल्या राजकीय पोळ्या भाजत असल्याचा आरोपही गोरे यांनी केलाय...
जयकुमार गोरे यांनी महिला डॉक्टर आत्महत्येप्रकरणी केलेल्या वक्तव्यावरून विरोधकांनी जयकुमार गोरेंवर जोरदार निशाणा साधलाय. महिला डॉक्टर आत्महत्या प्रकरणात जाणीवपूर्वक चारित्र्यहनन केलं जात आहे. या प्रकारात मंत्री जयकुमार गोरे यांच्यासारखे नेते चौकशीपूर्वीच मीडियाला बाईट देऊन वेगळे वळण देऊ पाहत आहेत. ज्यांचे उघडे -काळे कारनामे सर्व जगाला माहीत आहेत अशा जयकुमार गोरे यांनी तरी यात पडू नये. चौकशी आधीच मंत्री अशी व्यक्तव्ये करत असतील तर गृहविभाग नेमकं कोण चालवतो तेच समाजात नाही, असे ट्विट करत रोहित पवारांनी जयकुमार गोरेंवर जोरदार घणाघात केलाय.
फलटण महिला डॉक्टर प्रकरणात महिला आयपीएस अधिकाऱ्यांच्या नेतृत्वात एसआयटी नेमा' असे आदेश राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी पोलीस महासंचालकांना दिलेत. निष्पक्ष चौकशीसाठी तेजस्वी सातपुते यांच्या नेतृत्वाखाली विशेष तपास पथक नेमण्यात आले आहे.
