वर्धा : प्रत्येक शिक्षकासाठी शाळा म्हणजे एकप्रकारचं हृदय आणि विद्यार्थी म्हणजे आत्मा असतो. शाळा विद्यार्थ्यांनी भरून असली की शिक्षकांचाही उत्साह वाढतो. मात्र जर शाळा परिसर अस्वच्छ आणि घाणेरडा आणि विद्यार्थ्यांची संख्याच कमी असेल तर? अशीच परिस्थिती एकेकाळी वर्ध्यातील आर्वी येथील पीएम श्री शिवाजीनगर परिषद शाळेची होती. मात्र एकट्या शिक्षिकेने या कचरामय शाळेचं रुपडंच पालटलं. आणि शाळेतील पटसंख्या वाढून जिल्ह्यात सर्वात जास्त पटसंख्या असलेली प्राथमिक शाळा म्हणून ओळख दिलीय. या शाळेला 2023 मध्ये पीएम श्रीमध्ये समाविष्ट करण्यात आले.
advertisement
अनेक अडचणींचा केला सामना
शाळेच्या मुख्याध्यापिका पद्मा चौधरी यांच्या मुळे हे सर्व शक्य झालंय. 2012 मध्ये पद्मा मॅडमनी शाळेच्या मुख्याध्यापक म्हणून कार्यभार सांभाळला. शालेय कार्य करताना शाळेत त्या एकट्याच शिक्षिका होत्या आणि त्यांना यामुळे विविध अडचणींचा सामना करावा लागत होता. त्यावेळी पद्मा चौधरी यांनी पालक सभा घेऊन आपल्या अडचणी पालकांसमोर मांडल्या आणि नगरपरिषदकडे सहाय्यक शिक्षकाची मागणी केली. त्यांच्या मागणीला मान देऊन नगरपरिषदेने एक सहाय्यक शिक्षक शाळेला उपलब्ध करून दिले त्यावेळी 2012 मध्ये शाळेची पटसंख्या मात्र 47 इतकी होती.
राबविले विविध उपक्रम
पद्मा मॅडम यांनी शाळेत विविध शैक्षणिक उपक्रम राबवायला सुरुवात केली. त्यामध्ये त्यामध्ये पालकांचा सहभाग नोंदविला आणि सर्व उपक्रम पालकांनपर्यंत पोहोचविल्या परिसरातील पालकांमध्ये उत्सुकता निर्माण झाली. त्यांनी आपल्या मुलांना इंग्रजी शाळेच्या ऐवजी नगर परिषदच्या शाळेत दाखल करणे पसंत केले आणि हळूहळू आज या शाळेची पटसंख्या 118 इतकी येऊन पोहोचलेली आहे.
जिल्ह्यात सर्वात जास्त पटसंख्या असलेली प्राथमिक शाळा
सुरुवातीला शाळेचा परिसर अत्यंत घाणेरडा होता. परिसरातील लोक आपल्या घरातील कचरा शालेय परिसरात आणून टाकायचे. काही लोक मद्य पिऊन शाळेच्या परिसरात दिसायचे जुगार खेळायचे. पद्मा मॅडम यांनी परिसरातील लोकांना विनंती करून आणि नगरपरिषदच्या साह्याने या गोष्टींवर मात केली आणि आज शालेय परिसर स्वच्छ आणि सुंदर दिसत आहे. आज शाळेत तीन महिला शिक्षीकांसोबत एक शिक्षक कार्यरत आहे. आज ही शाळा वर्धा जिल्ह्यातील वर्ग 1 ते 4 च्या सर्वात जास्त पटसंख्या असलेली शाळा म्हणून ओळखले जाते.





