बुधवारी उत्तर भारतात ७ डिग्रीपर्यंत तापमान खाली घसरलं होतं. राजधानी दिल्लीमध्ये देखील 12 डिग्रीपर्यंत तापमान घसरलं होतं. तर दिवसाचं तापमान 26 डिग्रीपर्यंत आहे. पुढच्या 24 तासात तापमानात आणखी काही बदल होण्याची शक्यता आहे. आता जॅकेट आणि स्वेटर काढण्याची वेळ आली आहे. दक्षिणेकडील राज्यांमध्ये अरबी समुद्रात तयार झालेल्या सायक्लोनिक सर्क्युलेशनमुळे मुसळधार पाऊस राहणार आहे.
advertisement
हवामान खात्याच्या म्हणण्यानुसार, सध्या देशाच्या विविध भागात तीन प्रमुख चक्राकार वारे सक्रिय आहेत. पहिली प्रणाली मध्य बंगालच्या उपसागरावर आहे, जी समुद्रसपाटीपासून सुमारे ३.१ किमी उंचीवर पसरलेली आहे. दुसरी प्रणाली आग्नेय बांगलादेश आणि आसपासच्या भागात सक्रिय आहे. तिसरी प्रणाली तामिळनाडू आणि त्याच्या आसपासच्या भागात आहे. या वाऱ्यांचा दक्षिण भारतातील हवामानावर परिणाम होत आहे, जिथे केरळ, तामिळनाडू आणि अंदमान आणि निकोबार बेटांवर पाऊस पडत आहे.
हवामान खात्याच्या मते, पुढील २४ तासांत मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि झारखंडच्या काही भागात थंडीची लाट निर्माण होऊ शकते. १२ नोव्हेंबर रोजी तामिळनाडूमध्ये हलका ते मध्यम पाऊस आणि विजांच्या कडकडाटासह पाऊस पडण्याची शक्यता आहे. दिल्ली-एनसीआरमध्ये पाऊस पडणार नसला तरी, सकाळी हलके धुके आणि थंड वारे वातावरण थंड ठेवतील. शिवाय, जम्मू-काश्मीर, हिमाचल प्रदेश, पंजाब, उत्तराखंड, राजस्थान आणि मध्य प्रदेशातील अनेक भागात किमान तापमान ७ ते १० अंश सेल्सिअस दरम्यान राहू शकते.
हवामान तज्ज्ञ डॉ. सुप्रीत यांनी दिलेल्या माहितीनुसार पूर्व राजस्थान आणि विदर्भातील तापमान सामान्यपेक्षा ५ अंशांनी कमी झाले आहे. १२ ते १५ नोव्हेंबर दरम्यान मध्य प्रदेश, दक्षिण हरियाणा, ईशान्य राजस्थान आणि छत्तीसगडमध्ये थंडीची लाट कायम राहू शकते. मुंबईसह उपनगरात गारठा वाढला आहे. गार अल्हाददायक वातावरण असल्याने मुंबईकर सुखावला आहे. गुलाबी थंडीची मजा घेत आहेत.
नागपूरसह विदर्भाच्या अनेक भागाचा थंडीचा तडाखा वाढला. गुलाबी थंडीचा आनंद घेण्यासाठी नागपूरकर मॅार्निंग वॅाकला बाहेर पडत आहेत. नागपूरचा पारा १२ अंशावर, आणखी थंडी वाढण्याची शक्यता आहे. उत्तर भारतातून येणाऱ्या थंड वाऱ्यामुळे वाढला थंडीचा तडाखा बसणार आहे. नागपूरमध्ये दिवसभरातील तापमान सरासरीपेक्षा तीन अंशाने कमी असल्याने गारवा जाणवत आहे. विदर्भातील बहुतांश जिल्ह्यांना थंडीचा येलो अलर्ट देण्यात आला आहे.
दुसरीकडे मात्र मध्य महाराष्ट्र आणि विदर्भात मात्र अलर्ट जारी करण्यात आला आहे. तिथे तापमानाचा पार घसरला आहे. सलग दुसऱ्या दिवशी तापमान कमी असल्याने नागरिकांसाठी इशारा देण्यात आला आहे. ४८ तास महाराष्ट्रातील अनेक भागांमध्ये रात्रीचे तापमान ४ डिग्रीने घसरण्याची शक्यता असल्याने, नागरिकांनी काळजी घ्यावी असं आवाहन हवामान विभागाने केलं आहे.
