मुंबई : विमानाने प्रवास करणाऱ्या प्रवाशांसाठी अतिशय महत्त्वाची आणि तितकीच आनंदाची बातमी समोर आलेली आहे. आता मुंबई विमानतळाला आता जागतिक दर्जाचं स्वरूप मिळणार असून मुंबईची गणना लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या शहरांमध्ये होणार आहे. मात्र नेमका कोणता बदल करण्यात येणार आहे ते जाणून घ्या.
advertisement
नवी मुंबई विमानतळावर मोठा निर्णय
नवी मुंबईतील उलवे येथे देशातील सर्वात मोठा ग्रीनफील्ड विमानतळ उभारला जात आहे. हा विमानतळ 1,160 हेक्टर जागेवर विकसित होत असून अदाणी समूह आणि सिडको यांच्या भागीदारीतून तयार केला जात आहे. या प्रकल्पाचा खर्च सुमारे 19,650 कोटी रुपये आहे. नवी मुंबई विमानतळ सुरू झाल्यानंतर मुंबईच्या विद्यमान विमानतळातही काही मोठे बदल होणार आहेत.
नेमका काय होणार बदल?
अदाणी एअरपोर्ट होल्डिंग्ज लिमिटेडचे सीईओ अरुण बन्सल यांनी सांगितले की, नवी मुंबई विमानतळाचे टर्मिनल 2 पूर्ण झाल्यावर मुंबईतील छत्रपती शिवाजी महाराज आंतरराष्ट्रीय विमानतळाचे टर्मिनल 1 (सांताक्रूझ) पुन्हा नव्याने बांधले जाईल. हे काम 2029 पर्यंत पूर्ण होईल. त्यामुळे मुंबई आता लंडन, न्यूयॉर्क आणि टोकियोसारख्या जागतिक शहरांच्या यादीत सामील होईल, जिथे एकापेक्षा जास्त आंतरराष्ट्रीय विमानतळ आहेत.
नवी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळ डिसेंबर 2025 पर्यंत सुरू होण्याची अपेक्षा आहे. या विमानतळामुळे सांताक्रूझ आणि अंधेरी येथील विमानतळांवरील ताण कमी होईल आणि हवाई सेवा अधिक कार्यक्षम बनेल. काही महिन्यांपूर्वी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते या विमानतळाचे उद्घाटन झाले आहे.
हा विमानतळ महाराष्ट्रातील विकासासाठी एक गेमचेंजर ठरणार आहे. एअर इंडिया, इंडिगो आणि अकासा एअर यांसारख्या प्रमुख विमान कंपन्या इथून सेवा सुरू करणार आहेत. येथून दिल्ली, बंगळूरू, चेन्नई, हैद्राबाद आणि कोलकाता यांसारख्या प्रमुख शहरांसाठी विमानसेवा उपलब्ध असेल. इंडिगो दररोज 36 देशांतर्गत आणि 14 आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करणार आहे, तर अकासा एअर दररोज 40 उड्डाणे करणार आहे. पण, त्यापैकी 8 ते 10 आंतरराष्ट्रीय उड्डाणे सुरू करेल.
नवी मुंबई विमानतळापर्यंत पोहोचण्यासाठी राष्ट्रीय महामार्ग 4B आणि आमरा मार्ग हे मुख्य रस्ते असतील तसेच नेरुळ-उरण रेल्वे मार्गावरील तारघर रेल्वे स्थानकही विमानतळाजवळच आहे. या प्रकल्पामुळे मुंबई आणि नवी मुंबई परिसरातील वाहतूक, व्यापार आणि रोजगाराच्या संधींमध्ये मोठी वाढ होणार आहे.
