पाटणा: बिहार विधानसभा निवडणूक 2025 चे निकाल जवळपास स्पष्ट झाले असून बिहारच्या मतदारांनी तेजस्वी यादव आणि त्यांच्या राष्ट्रीय जनता दलाला मोठा धक्का दिला आहे. दुपारी वाजता आलेल्या कलांनुसार महागठबंधन (आरजेडी–काँग्रेस–डावे) केवळ 50 जागांवर आघाडीवर असून एनडीए (बीजेपी–जेडीयू) तब्बल 189 जागांवर पुढे आहे. इतकेच नव्हे तर तेजस्वी यादव स्वतःच्या मतदारसंघातही मागे असल्याचे दिसत आहे. म्हणजेच बिहारच्या जनतेने महागठबंधनाला फक्त हरवले नाही, तर मोठ्या प्रमाणात नाकारले आहे. निवडणुकीच्या दिवशीपर्यंत ‘तगडी टक्कर’ देण्याचा दावा करणारा आरजेडी असा कोसळला कसा?
advertisement
52 यादव उमेदवारांना तिकीट देण्याचा निर्णय उलटला
या पराभवामागील प्रमुख कारणांपैकी एक म्हणजे आरजेडीने 144 पैकी तब्बल 52 तिकीटे यादव उमेदवारांना देणे. म्हणजेच सुमारे 36% तिकीटे यादव जातीतून दिली गेली. बिहारची राजकारण जातीय समीकरणांवर आधारित असली तरी हा निर्णय मतदारांना ‘यादव राज’ परत येत असल्याचा संदेश देऊन गेला. यादव हे आरजेडीचे कोर मतदार (सुमारे 14% लोकसंख्या) असले तरी इतर मागास, अति-मागास आणि सवर्ण मतदार या जातीय समीकरणामुळे महागठबंधनापासून दूर गेले.
2020 मध्ये यादव उमेदवारांची संख्या 40 होती. ते 52 पर्यंत वाढवणे हा तेजस्वींचा ‘यादव एकीकरण’ प्लॅन होता, पण यामुळे इतर समुदाय दुरावले.
बीजेपीने जोरदारपणे “आरजेडी म्हणजे यादव राज” हे नरेटिव्ह फिरवले. जे शहरी आणि मध्यमवर्गीय मतदारांत प्रभावी ठरले.
याउलट अखिलेश यादव यांनी 2024 मध्ये फक्त 5 यादव उमेदवारांना तिकीट देत निवडणूक लढवली आणि इतर जातिंना सोबत घेतलं, तेजस्वी हे करण्यात अपयशी ठरले.
आघाडीतील पक्षांना योग्य महत्त्व न देणे
-तेजस्वी यादव यांची दुसरी मोठी चूक म्हणजे महागठबंधनातील सहयोगींना काँग्रेस, डावे पक्ष आणि लहान पक्ष ‘समान भागीदार’ म्हणून वागणूक न देणे.
-सीट-शेअरिंगवरील तणाव, घोषणापत्रात स्वतःलाच प्राधान्य देणे आणि प्रचारात सहयोगींना मागे ठेवणे, या गोष्टी गठबंधनासाठी घातक ठरल्या.
-काँग्रेस ‘गारंटी’ मॉडेलवर भर देत होती, पण तेजस्वींनी स्वतःचे ‘नोकऱ्यांचे वादे’ जास्त पुढे केले. घोषणापत्रालाही ‘तेजस्वी प्रण’ असे नाव दिले गेले, यामुळे सहयोगी पक्ष नाराज झाले.
-रॅलींमध्ये राहुल गांधीपेक्षा तेजस्वीच अधिक दिसत होते. गठबंधनाची एकजूट ढासळली, तर दुसरीकडे एनडीए अधिक संघटित दिसला.
यादी मोठी, पण ब्लूप्रिंट शून्य
-तेजस्वींनी रोजगार, महिलांसाठी योजना, पेंशन, आणि दारूबंदीची समीक्षा अशा अनेक मोठ्या घोषणा केल्या.
-पण या वचनांची अंमलबजावणी कशी होणार? पैसा कुठून येणार? वेळापत्रक काय? याबाबत कोणतीही स्पष्टता दिली नाही.
-‘प्रत्येक घरात सरकारी नोकरी’ हा सर्वात मोठा दावा होता, पण याबाबत ठोस ‘ब्लूप्रिंट’ मागितल्यास ते उत्तर देऊ शकले नाहीत. दररोज “2 दिवसात ब्लूप्रिंट येईल” असे सांगितले, पण तो दिवस कधीच आला नाही. या अनिश्चिततेमुळे मतदारांमध्ये अविश्वास वाढला.
मुस्लिम-अनुकूल प्रतिमा
महागठबंधनाचा ‘मुस्लिम-अनुकूल’ ठरलेला प्रतिमेला बीजेपीने अत्यंत प्रभावीपणे उचलून धरले. मुस्लिम बहुल सीटांवर आरजेडीला फायदा झाला असला तरी उर्वरित राज्यात त्याचा तोटा जास्त झाला. काही ठिकाणी यादव मतदारांनीही आरजेडीकडे पाठ फिरवली. वक्फ बिलविषयी तेजस्वींच्या भूमिकेमुळेही अनेक सामाजिक घटक नाराज झाले. बीजेपीने लालू यादवांच्या संसदेतल्या वक्फ बिलविरोधी भाषणाचे क्लिप्स मोठ्या प्रमाणात व्हायरल करून त्याचा पूर्ण फायदा घेतला.
गोंधळलेली भूमिका
तेजस्वींनी लालूंची सामाजिक न्यायाची विचारधारा स्वीकारली, पण ‘जंगलराज’ छबी टाळण्यासाठी त्यांच्यापासून दूर राहण्याचा प्रयत्न केला. पोस्टर्समध्ये लालूंच्या फोटोंना छोटं स्थान दिलं, यामुळे समर्थक नाराज झाले आणि विरोधकांनीही यावर टीका केली. मोदींनी सार्वजनिक मंचावर म्हटलं की “तेजस्वी लालूंचे पाप लपवत आहेत”. या ‘दुहेरी रणनीती’चा फटका थेट आरजेडीला बसला.
