पोलिस आयुक्तालयाने दिलेल्या माहितीनुसार कामाचा ताण, कौटुंबिक वाद, पत्नीचा त्रास, प्रेमसंबंधातील धोका, लग्नास नकार, बेरोजगारी आणि काही वेळा कौटुंबिक हिंसाचार ही आत्महत्यांची मुख्य कारणे आढळली आहेत. समाजात पुरुषांकडे अपेक्षेचा काचेसारखा भिंतीचा दाब असल्याने त्यांच्यावरचा मानसिक ताण दुपटीने वाढत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे.
मानसिक आरोग्य तज्ज्ञ गायत्री सहस्रबुद्धे सांगतात, स्त्रियांच्या तुलनेत पुरुष भावना व्यक्त करण्यात कमी पडतात. लहानपणापासूनच त्यांना पुरुष रडत नाही, कमजोरी दाखवायची नसते असे शिकवले जाते. त्यामुळे दुःख, ताण किंवा वेदना मनातच दाबून ठेवण्याची सवय तयार होते. ही घुसमट दीर्घकाळ वाढत गेली की आत्महत्येसारखा टोकाचा निर्णय घेतला जातो.
advertisement
Winter Tips : थंडीत हीटरसारखे काम करतात 'ही' रोपं, वाढत्या थंडीत तुमचं घर ठेवतील उबदार आणि फ्रेश!
अनेक पुरुष समस्यांच्या काळात स्वतःच्या कोषात जातात. मित्रांशी, कुटुंबीयांशी किंवा जोडीदाराशी मनमोकळा संवाद न केल्याने त्यांची मानसिक अवस्था अधिकच बिघडत जाते. सामाजिक स्तरावर पुरुषांच्या यशाचे मोजमाप पैसा, नोकरी, गाडी, घर यांसारख्या बाह्य गोष्टींवर केले जाते. या अपेक्षांच्या ओझ्याखाली अनेक तरुण-प्रौढ पुरुष दबून जातात.
आजच्या डिजिटलयुगात सामाजिक माध्यमांचाही पुरुषांच्या मानसिक आरोग्यावर मोठा परिणाम होत असल्याचे तज्ज्ञांचे म्हणणे आहे. स्वतःची तुलना इतरांशी करणे, यशस्वीतेचे खोटे मापदंड, लाईक्स-कमेंट्सचा दबाव, बॉडी इमेजचे स्टँडर्ड या सर्वामुळे ताण, नैराश्य आणि मनःस्थिती ढासळण्याच्या घटना वाढत आहेत.
स्त्रिया बोलून रिलिज होतात, पण पुरुष मात्र या सर्वाचा भार शांतपणे सहन करतात. परिणामी परिस्थिती हाताबाहेर जात असताना ते मदत मागण्याऐवजी टोकाचा निर्णय घेतात. तज्ज्ञांच्या मते, पुरुषांना देखील भावनिक आधार, समजून घेणारे मित्र, कुटुंबीय आणि संवादाचे सुरक्षित व्यासपीठ तितकेच आवश्यक आहे, असं गायत्री सहस्रबुद्धे म्हणतात.
घरातील पुरुषांशी नियमित संवाद साधावा. मित्रांसोबत, सहकाऱ्यांसोबत मन मोकळं करण्याचं वातावरण निर्माण व्हायला हवं. मानसिक आरोग्याबाबत हे फक्त महिलांचे प्रश्न आहेत अशी समजूत मोडून काढण्याची हीच वेळ आहे.
पुण्यातील वाढत्या आकडेवारीने शहरातील मानसिक आरोग्याबद्दलच्या उपाययोजनांकडे अधिक गांभीर्याने पाहण्याची गरज अधोरेखित केली आहे. तज्ज्ञांचे म्हणणे आहे की नैराश्य, चिंताजनक विचार, सततची हतबलता, झोपेतील व्यत्यय, चिडचिड ही सर्व लक्षणे मानसिक तणावाची असतात आणि अशा वेळी तात्काळ मदत घेणे अत्यावश्यक आहे.
पुरुषांच्या मानसिक आरोग्याविषयी खुलेपणाने बोलणे, भावना व्यक्त करण्याची संधी देणे आणि समाजातील चुकीच्या समजुती दूर करणे हे आत्महत्यांचे प्रमाण कमी करण्यासाठी पहिलं आणि सर्वात महत्त्वाचं पाऊल ठरू शकतं.





