बिबट्याच्या दहशतीखाली असलेल्या शिरुरमध्ये भलतंच संकट उभं राहिलंय. बिबट्याच्या भीतीपोटी शिरुरमधील विवाह इच्छुक तरुणांची लग्न जमेनाशी झाली आहेत. सगळं जुळत असतानाही केवळ बिबट्याचं कारण देऊन मुलींच्या पालकांकडून नकार दिला जातोय.तर दुसरीकडे वनमंत्री गणेश नाईक यांनी बिबट्यांचे हल्ले रोखण्यासाठी मोठी घोषणा केली आहे.
बिबट्यामुळे लग्न रखडली
शिरुरमधील या माऊलीची व्यथा.....सगळं काही आहे .घर, शेती, शिक्षण पण तरीही केवळ बिबट्यांमुळे या भागातील तरुणांची लग्न रखडली आहेत. बिबट्याच्या दहशतीखाली वावरत असलेल्या शिरूर तालुक्यामधील गावांत एकाही मुलाची सोयरिक जमेनाशी झाली आहे. लग्नासाठी मुली न मिळाल्यानं गावांतील अनेक तरुणांची स्वप्नं अधांतरी लटकलीत. फक्त बिबट्याच्या भीतीमुळे कोणतेच पालक या गावात आपल्या मुली द्यायला धजावत नाहीयेत. या परिसरातील अनेक तरुण वेल सेटल असूनही केवळ बिबट्यामुळे त्यांची लग्न रखडली आहेत.
advertisement
गावकऱ्यांवर जीव मुठीत घेऊन जगायची वेळ
पुणे जिल्ह्यातील अनेक गावांत बिबट्यामुळे जगणं मुश्किल झालं आहे. आंबेगाव, शिरूर, जुन्नर, खेड तालुक्यातील परिस्थिती भयावह आहे. कधी भरवस्तीत तर कधी शेतात काम करणाऱ्यांना गाठून... कधी गोठ्यातील गुरांचं नरडं पकडून बिबट्या हल्ले करत आहे.त्यामुळे इथल्या गावकऱ्यांवर जीव मुठीत घेऊन जगायची वेळ आली आहे. दिवसाढवळ्या बिबट्याचं दर्शन होत असल्यानं शेतात काम करताना बिबट्यापासून संरक्षण करण्यासाठी ग्रामस्थ चक्क खिळे लावलेले पट्टे गळ्यात घालत आहेत.
बिबट्यांना ऑन द स्पॉट शूट करा, वनमंत्र्यांचे आदेश
बिबट्याच्या या वाढत्या दहशतीच्या पार्श्वभूमीवर वनमंत्री गणेश नाईक यांनी शिरुर तालुक्यातील पिंपरखेडमध्ये बिबट्याच्या हल्ल्यात मृ्त्यू झालेल्या पीडित कुटुंबाची भेट घेतली. नरभक्षक बिबट्या दिसला तर त्याला दिसताक्षणी गोळ्या घाला असे आदेश त्यांनी यावेळी दिले. नरभक्षक बिबट्यांना ऑन द स्पॉट शूट करा , मार्ग काढण्यासाठी सतर्क राहू... बिबट्यांना रवाना करण्याचे आदेश दिले आहे.
बिबट्या जीवघेणी नाही तर सामाजिक समस्या
शिरुरच्या ग्रामीण भागात बिबट्या मानव संघर्ष गेल्या काही दिवसात प्रचंड प्रमाणात वाढलाय. बिबट्याच्या हल्ल्यात अनेकांना आपला जीव गमवावा लागल.आता तर तिथल्या तरुणांची लग्नही जमेना झाली. त्यामुळे बिबट्याची ही भीती आता केवळ जीवघेणी राहिलेली नसून, ती एक सामाजिक समस्याही बनत चालली आहे.
