नवी मुंबई: आयसीसी महिला वर्ल्ड कप २०२५मध्ये भारताच्या महिला क्रिकेट संघाने शानदार कमबॅक करत अंतिम फेरीत धडक मारली आहे. आता भारतीय संघाचा सामना उद्या म्हणजेच रविवार २ नोव्हेंबर रोजी नवी मुंबईतील डॉ. डी. वाय. पाटील स्पोर्ट्स अकादमी स्टेडियम येथे दक्षिण आफ्रिकेशी होणार आहे. ही फायनल मॅच चुरशीची होण्याची अपेक्षा आहे.
advertisement
टीम इंडियाचे शानदार कमबॅक
टीम इंडियाचा वर्ल्ड कपमधील प्रवास चढ-उतारांनी भरलेला होता. सुरुवातीला संघाने जबरदस्त प्रदर्शन केले, पण मधल्या टप्प्यात सलग तीन पराभवांमुळे ते थोडे मागे पडले होते. मात्र त्यानंतर त्यांनी जोरदार पुनरागमन केले आणि अंतिम फेरीपर्यंत मजल मारली. उपांत्य फेरीत जेमिमा रोड्रिग्सने आपल्या कारकिर्दीतील सर्वोत्तम खेळी केली. तिने नाबाद १२७ धावा ठोकून ऑस्ट्रेलियाविरुद्ध भारताला विक्रमी विजय मिळवून दिला. कर्णधार हरमनप्रीत कौरनेही ८९ धावांचे महत्त्वाचे योगदान दिले. या दोघींच्या शानदार फलंदाजीमुळे भारताने ३३९ धावांचे लक्ष्य यशस्वीरित्या पूर्ण केले. महिला विश्वचषकाच्या बाद फेरीच्या (नॉकआऊट) इतिहासातील ही सर्वात मोठी यशस्वी धावसंख्या पाठलाग (Run Chase) ठरली.
दक्षिण आफ्रिकेचे दमदार प्रदर्शन
दुसरीकडे दक्षिण आफ्रिकेचा संघ संपूर्ण स्पर्धेत सातत्याने उत्कृष्ट कामगिरी करणारा संघ राहिला आहे. लॉरा वोल्वार्ड्टच्या नेतृत्वाखाली प्रोटियाझ संघाने शिस्त आणि आक्रमकता यांचा उत्तम समन्वय दाखवला आहे. अष्टपैलू खेळाडू मॅरिजॅन कॅप आणि वेगवान गोलंदाज अयाबोंगा खाका यांनी महत्त्वाच्या सामन्यांमध्ये प्रभावी कामगिरी केली आहे. उपांत्य फेरीत दक्षिण आफ्रिकेने इंग्लंडला पराभूत करून अंतिम फेरीतील आपले तिकीट निश्चित केले.
नवी मुंबईतील हवामान अंदाज
नवी मुंबईतील हवामानाबद्दल बोलायचं झाल्यास दिवसभर गरम आणि दमट हवामान असेल. सकाळच्या वेळी आकाश ढगाळ राहण्याची शक्यता असून तापमान ३२°C पर्यंत पोहोचू शकते, जे दुपारच्या उन्हात ३९°C इतके जाणवेल. आर्द्रता (Humidity) जास्त राहील आणि हलक्या पावसाचीही शक्यता आहे. परंतु त्यामुळे सामन्यात मोठा व्यत्यय येईल अशी अपेक्षा नाही. दक्षिणेकडून येणारे वारे सुरुवातीला वेगवान गोलंदाजांना थोडी मदत करू शकतात. पण खेळ पुढे सरकत असताना फलंदाजीसाठी परिस्थिती अधिक चांगली होण्याची अपेक्षा आहे.
लक्ष्य पाठलाग करणाऱ्या संघाला फायदा
संध्याकाळपर्यंत तापमान सुमारे २५°C पर्यंत खाली येईल. पण हवेतील आर्द्रता कायम राहील. दुसऱ्या डावात दव (Dew) चा परिणाम खूप महत्त्वाचा ठरू शकतो. ज्यामुळे नाणेफेक जिंकणाऱ्या संघासाठी धावांचा पाठलाग करणे (Cheze करणे) फायदेशीर ठरू शकते. रात्री कृत्रिम प्रकाशात (Floodlights) खेळताना संघांना फायदा होऊ शकतो, कारण मैदान थोडे ओले होण्याची शक्यता असल्याने गोलंदाजांना चेंडूवर पकड ठेवणे कठीण होऊ शकते.
