देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले, मतभेद मिटू शकतात, खडसेंकडून दिल जमाईचे संकेत!
- Published by:Akshay Adhav
Last Updated:
देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच खडसे यांनी दिलजमाईचे संकेत दिले.
जळगाव : देवेंद्र फडणवीस आणि मी सोबत काम केले आहे. आमच्यात काही तात्विक मतभेद कालही होते, आजही आहेत परंतु उद्या ते मतभेद मिटू शकतात, असे विधान ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे यांनी केले.
एकनाथ खडसे यांनी भाजप सोडण्याला देवेंद्र फडणवीस हेच कारणीभूत असल्याचे अनेक वेळा सांगितले. तसेच माझ्यासारख्या बहुजन व्यक्तीने भाजप गावोगावी पोहोचवली परंतु सत्ता येताच आम्हाला बाजूला सारले, अशी आगपाखड त्यांनी फडणवीस यांच्यावर केली. गेली चार-पाच वर्षे खडले यांनी संधी मिळेल तेव्हा फडणवीस यांना बोल लावले. परंतु फडणवीस यांनी मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच खडसे यांनी दिलजमाईचे संकेत दिले.
advertisement
देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले, आम्ही आजही एकमेकांशी बोलतो. भारत पाकिस्तान यांचे जसे संबंध आहेत, तसे तर आमचे अजिबात नाहीत. येत्या काळात आमच्यातले मतभेद मिटू शकतात, असे खडसे म्हणाले. ते आज जळगावात पत्रकारांसोबत बोलत होते.
आमचे मतभेद मिटू शकतात
देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले आहेत. आम्ही एकमेकांशी बोलतो. मात्र सरकारचा विषय आला तर मी माझी भूमिका मांडतोच. व्यक्तिगत एकमेकांशी दुश्मनी नसते. राजकारणामध्ये मी अनेक वेळा भूमिका बदलली आहे. कधी मी भाजपमध्ये होतो, कधी राष्ट्रवादीमध्ये होतो. परत भाजपमध्ये जाण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे व्यक्तिगत द्वेष नसतो. राजकीय जीवनामध्ये एकमेकांवर आरोप करताना व्यक्तिगत दोष नसतो. देवेंद्र फडणवीस यांच्यासोबत माझे तात्विक मतभेद होते ते आजही आहे. पण पुढच्या काळामध्ये तात्विक मतभेद मिटूही शकतील. आमचं भारत पाकिस्तान सारखा युद्ध चाललंय असे नाही. एकमेकांविषयी आमच्यामध्ये काही वेळ तणाव असू शकतो. काही वेळा तो मिटूही शकतो. राजकारणात काही भूमिका वेळेनुसार बदलाव्याही लागतात, असे एकनाथ खडसे म्हणाले.
advertisement
महायुतीचा विजय, विधानसभा निकालावर खडसे काय म्हणाले?
महायुतीला एवढे घवघवीत यश मिळेल असे वाटले नव्हते. कारण महाराष्ट्राचे चित्र पाहिले तर महागाईने उच्चांक गाठला आहे, शेतकऱ्यांच्या शेतमालाला भाव नाही. बेरोजगारी कमी झाली नाही. अनेक विषय घेऊन आम्ही महाविकास आघाडीच्या माध्यमातून आम्ही भूमिका मांडली. परंतु महायुतीच्या माध्यमातून लाडक्या बहिणीच्या खात्यामध्ये साडेसात हजार त्यांनी तीन महिन्यात टाकले. ते साडेसात हजार महिलांच्या खात्यावर जमा झाले असून एक प्रकारे त्यांनी लाडक्या बहीणींकडून मते मिळवण्यासाठी महिलांना अप्रत्यक्षपणे लाच दिली, असा गंभीर आरोपही खडसे यांनी केला.
advertisement
ईव्हीएमवरील शंकेला वाव
ईव्हीएमवर अनेकांनी शंका व्यक्त केली असून काही उदाहरणे शंकाना बळकटी देणारे आहे. त्यामुळे काहीतरी गडबड घोटाळा असे म्हणायला वाव आहे, असेही खडसे म्हणाले. अनेक उदाहरणे माध्यमांसमोर आहेत. कुणाल रोहिदास पाटील यांच्याच गावात त्यांना शून्य मते मिळाली आहेत. कोणीतरी त्यांचा आधार असेल किंवा त्यांनी त्यांना मत देत असेल. मात्र, या ठिकाणी उमेदवाराच्या गावातच त्याला मत मिळालं नाही. जाणकारांनी याबाबतीत प्रश्न उपस्थित केला असून पुन्हा मतदान घेण्याची मागणी अनेकांनी केली आहे, असे खडसे यांनी सांगितले आहे.
view commentsLocation :
Jalgaon,Maharashtra
First Published :
December 07, 2024 10:24 PM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/
देवेंद्र फडणवीस यांच्याशी माझे संबंध चांगले, मतभेद मिटू शकतात, खडसेंकडून दिल जमाईचे संकेत!


