पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय, आता थेट 15 डब्ब्यांची गाडी इथं पर्यंत धावणार
- Published by:Mohan Najan
- Reported by:Bhavna Arvind Kamble
Last Updated:
चर्चगेट–विरार दरम्यान नियमित धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकलचा विस्तार आता डहाणू रोडपर्यंत करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे.
मुंबई : चर्चगेट–विरार दरम्यान नियमित धावणाऱ्या 15 डब्यांच्या लोकलचा विस्तार आता डहाणू रोडपर्यंत करण्याच्या हालचालींना गती मिळाली आहे. पश्चिम रेल्वे प्रशासनाने गेल्या काही महिन्यांत महत्त्वाची पायाभूत कामे पूर्ण केली असून एप्रिलपासून हा विस्तार प्रत्यक्षात येण्याची दाट शक्यता आहे. खासदार डॉ. हेमंत सवरा यांनी लोकसभेतही ही मागणी ठामपणे मांडल्याने प्रक्रियेला अधिक चालना मिळाल्याचे रेल्वे वर्तुळातून समजते.
सध्या उपनगरीय लोकल सेवा डहाणू येथेच संपतात, मात्र फलाटांच्या मर्यादित लांबीमुळे 15 डब्यांच्या रेकला तेथे जागा अपुरी पडते. सफाळे रेल्वे फाटकाचा अडथळा दूर झाल्यानंतर आणि उमरोळी स्थानकातील फलाट रुंदीकरणाचे काम मार्गी लागल्यानंतर परिस्थिती अनुकूल झाली आहे. डहाणू स्टेशनवरील एका फलाटावर दिवसभर ठेवण्यात येणारी डहाणू–वडोदरा इंटरसिटी एक्सप्रेस यार्डमध्ये हलवता आल्यास तो फलाट 15 डब्यांच्या लोकलसाठी वापरता येऊ शकेल. त्यामुळे मोठे फलाटविस्तार न करताही उपनगरी सेवेचा विस्तार सुलभ होण्याची शक्यता रेल्वे अधिकाऱ्यांनी व्यक्त केली आहे.
advertisement
विरार स्थानकात मोठे बदल
विरार स्थानकातील फलाट क्र. 5 ची सहा मीटर अतिरिक्त रुंदीकरणाची कामे वेगात सुरू आहेत. तसेच फलाट क्रमांक 3 व 4 यांचेही साडेतीन मीटरने रुंदीकरण होणार आहे. 15 डब्यांच्या गाड्या डहाणूपर्यंत सतत चालू ठेवण्यासाठी विरारमधील हा प्रकल्प अत्यंत महत्त्वाचा मानला जातो. पश्चिम रेल्वेकडे आवश्यक पॉईंट्स आणि लोको रेक उपलब्ध असल्याने अस्तित्वात असलेल्या 12 डब्यांच्या गाड्यांचे 15 डब्यांमध्ये रूपांतर करणे आता शक्य झाले आहे.
advertisement
सध्या डहाणू–विरार या दरम्यान दररोज दोन्ही बाजूंनी 19 लोकल सेवा उपलब्ध आहेत. मात्र 2026 पासून सेवावाढ करण्याचा रेल्वेचा प्राथमिक आराखडा तयार करण्यात येत आहे.
खासदारांचा पाठपुरावा
डहाणू–विरार मार्गावरील जवळपास अडीच लाख प्रवासी दररोज लोकल सेवेवर अवलंबून आहेत. वाढती गर्दी, उन्हाची तीव्रता आणि प्रवासाचा लांब पल्ला लक्षात घेता 15 डब्यांच्या तसेच वातानुकूलित लोकलची गरज अत्यंत तातडीची असल्याचा मुद्दा खासदार डॉ. सवरा यांनी संसदेत मांडला. विद्यार्थ्यांपासून नोकरदार, फळ-फूल उत्पादक आणि मच्छीमारांपर्यंत सर्वांना पहाटेची सेवा आवश्यक असल्याने सकाळी चारची लोकल सुरू करण्याची मागणीही त्यांनी केली.
advertisement
या मागण्यांची तात्काळ अंमलबजावणी झाल्यास पालघर लोकसभा क्षेत्रातील लाखो प्रवाशांचा प्रवास अधिक सुरक्षित, सोयीस्कर आणि वेगवान होईल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.
view commentsLocation :
Mumbai,Maharashtra
First Published :
December 09, 2025 11:05 AM IST
मराठी बातम्या/मुंबई/
पश्चिम रेल्वे प्रवाशांसाठी मोठा निर्णय, आता थेट 15 डब्ब्यांची गाडी इथं पर्यंत धावणार


