युवा वर्गात असलेली त्यांची लोकप्रियता पाहून राष्ट्रवादी काँग्रेसने निर्मला नवले यांना युवती कार्याध्यक्षपद देऊ केले होते. राज्यभरातील युवतींचे संघटन मजबूत करून त्याचा पक्षाला फायदा होईल, असे त्यामागचे नियोजन होते. नवले यांनी विविध भागात दौरेही केले. कारेगाव ग्रामपंचायतीच्या कारभाराचा त्यांना अनुभव होताच. त्यामुळेच त्यांनी पंचायत समितीच्या रिंगणात उतरण्याचा निर्णय घेतला. परंतु लोकांची साथ न लाभल्याने त्यांना पराजयाला सामोरे जावे लागले. पराभवानंतर त्यांनी भावुक पोस्ट लिहिली आहे.
advertisement
निर्मला नवले काय म्हणाल्या आहेत?
माझ्या नेतृत्वावर निस्वार्थपणे जीवापाड प्रेम करणाऱ्या, आणि माझ्या सुख-दुःखात सदैव प्रामाणिकपणे माझ्यासोबत उभे राहणाऱ्या, मी निवडून येण्यासाठी सर्वोतोपरी प्रयत्न करणाऱ्या माझ्या सर्व सहकाऱ्यांचे मनापासून खूप-खूप धन्यवाद. तुमची निर्मला पंचायत समितीवर जाण्यासाठी मागील दोन महिने आपण सर्वांनी जे अथक परिश्रम घेतले, रात्र-दिवस एक करून जे कष्ट उपसले-त्या प्रत्येक प्रयत्नासाठी मी मनापासून ऋणी आहे, असे निर्मला नवले यांनी म्हटले.
तसेच, तुमच्या या साथीनं मला पुन्हा उभं राहण्याची, नव्या जिद्दीनं पुढे जाण्याची ताकद दिली आहे. ही लढाई इथे थांबत नाही... तुमच्यासोबत चालायचा हा प्रवास आजही सुरूच आहे, अशी भावनिक प्रतिक्रिया निर्मला नवले यांनी समाज माध्यमांद्वारे दिली. सत्तेचे काय कधी येते कधी जाते... असे भावनिक गीतही त्यांनी स्टोरीला ठेवून आपल्या मनातील भावनांना वाट मोकळी करून दिली आहे.
कोण आहेत निर्मला नवले?
निर्मला नवले या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या युवती कार्याध्यक्षा आहेत
त्यांनी कारेगाव सारख्या मोठ्या ग्रामपंचायतीचे सरपंचपद भूषणवले आहे
पेशाने इंजिनिअर असलेल्या निर्मला नवले यांना समाजसेवेची आवड आहे
सासरच्या नवले कुटुंबात राजकारणाचा वारसा असल्याने त्यांनी राजकारणात पाऊल ठेवले
समाज माध्यमांवर त्यांच्या व्हिडीओ, रिल्सला लाखो शेअर कमेंट असतात
