सोलापूर : जिल्हा परिषद आणि पंचायत समितीची निवडणूक नुकतीच पार पडली आहे. या निवडणुकीनंतर आरोप प्रत्यारोपाचा सामना रंगला आहे. अशातच सोलापूरचे पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी गंभीर आरोप केला आहे. माळशिरसचे माजी आमदार राम साातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. त्यांच्यावर हल्ल्याचा प्रयत्न झाला होता, असा आरोप गोरे यांनी केला आहे. गोरे यांच्या आरोपामुळे खळबळ उडाली आहे.
advertisement
पालकमंत्री जयकुमार गोरे यांनी आज सोलापूरमध्ये पत्रकार परिषद घेऊन गंभीर आरोप केला आहे. 'माळशिरसचे माजी आमदार राम सातपुते यांच्या हत्येचा कट रचला गेला होता. जे मला गुंड म्हणत आहे, ते सर्वात मोठे गुंड आहेत. माळशिरसमध्ये बघा कुठल्या पद्धतीचं वातावरण आहे. अनेक कार्यकर्त्यांना मारहाण झाली. ज्या पद्धतीचे भाजपला मत मिळाली आहे. ते बघून भाजप कार्यकर्त्यांना मारहाण आणि दमबाजी झाली. त्याठिकाणी माजी आमदार राम सातपुते यांच्यावर हल्ला करण्याचा प्रयत्न झाला. आणि त्यातून त्यांच्या खुनाचा कट होता अशी माहिती समोर येत आहे' असा आरोप गोरे यांनी केला.
तसंच, राम सातपुते यांच्यावर कोण हल्ला करणार होते, या प्रकरणाचा पोलीस याचा तपास करत आहे. हा कट कोणी रचला होता ते भविष्यात पोलीस तापासात समोर येईल, याबाबत कोण गुंडा आहे. हे समोर येईलच त्यानंतर आपण चर्चा करू' असंही गोरे म्हणाले.
'अजित पवारांच्या विमान अपघाताची चौकशी झाली पाहिजे'
"रोहित पवार यांनी अजित पवार यांच्या विमान अपघातासंदर्भात चौकशी झाली पाहिजे, हे मत मांडलं आहे. चौकशी झालीच पाहिजे, असं आमचं मत आहे. त्या विमान अपघाताची चौकशी सुरू आहे. ब्लॅक बॉक्स मिळालेला आहे. त्यामुळे त्याबाबतीत अधिकच बोलणं योग्य नाही. चौकशीसाठी कुठली एजन्सी असली पाहिजे. याचा निर्णय सुरक्षा एजन्सी घेतील. सुरक्षा यंत्रणा राज्य आणि केंद्र सरकार ठरवतील' असंही गोरे म्हणाले.
पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्लॅन होता
"भाजपमध्ये पण अशी काही लोक आहेत ज्या पद्धतीने भाजप पुढे जातो आहे ते नको आहे. भाजपचं यश काही लोकांना पचत नव्हतं. काही लोक आजही आहेत. येथे व्यक्ती म्हणून कोणी नाही, भाजपचे केडर आहे. इथं संघटन आहे म्हणून आम्ही जिंकलो आहोत. जयकुमार गोरे किंवा इतर कोणी आहे म्हणून नाही. पालकमंत्री अपयशी झाल्यानंतर काय करायचं, याचाही प्लॅन आखला गेला होता. जर बहुमत नाही मिळालं तर कोणाला सोबत घ्यायचं याचाही प्लॅन केला गेला होता. पक्ष आणि पक्ष नेतृत्वाला बदनाम करण्याचा प्लॅन होता. पक्षापेक्षा आम्ही कसे मोठे आहोत हे दाखवण्याचा काही जणांचा प्रयत्न होता. पण मी भाजपच्या कार्यकर्ते आणि जनतेचे आभार मानतो. कोणत्याही बळी न पडता आमच्या मागे उभे राहिले' असंही जयकुमार गोरे म्हणाले.
"पराभव झाल्यानंतर कारण सांगण्याची मला सवय नाही. पराभव काय झालं याचं विश्लेषण मी करणार नाही. मात्र, झालेला पराभव स्वीकारतो. सोलापूर कडे लक्ष होतं, त्यामुळे साताऱ्याकडे दुर्लक्ष झालं हे खरं आहे. केवळ दुर्लक्ष होणे हे एकमेव पराभवाचे कारण नाही. असे अनेक पराभवाचे धक्के स्वीकारलेले आहेत. या धक्क्यातून मार्ग काढून पुढे जाण्याचा नेहमी प्रयत्न करतो. राजकारणातून प्रत्येक जण अशा पराभव होऊन जातो. मुख्यमंत्र्यांनी आम्हाला सांगितलं आहे पराभव हा अंतिम नसतो आणि विजयी अंतिम नसतो. कामात सातत्य असले पाहिजे' अशी प्रतिक्रियाही गोरेंनी दिली.
