स्कायमेटचे हवामान तज्ज्ञ महेश पलावत यांनी दिलेल्या माहितीनुसार, मागच्या तीन चार दिवसांपासून दिवसभर कमालीची उष्णता आणि पहाटे गारवा जाणवत आहे. अचानक हवापालट झाल्याने त्याचा त्रास होऊ लागला आहे. कोकण पट्ट्यात मे महिन्यासारख्या उन्हाच्या झळा बसत आहेत. उत्तर भारतात सध्या थंडी ओसरून उन्हाचा चटका जाणवू लागला असला, तरी हवामान खात्याने दिलेला नवा अंदाज बळीराजाची चिंता वाढवणारा आहे. सलग येणाऱ्या 'वेस्टर्न डिस्टरबेंस'मुळे पुढील आठवड्यात उत्तर आणि मध्य भारतात पावसासह गारपिटीची शक्यता वर्तवण्यात आली आहे.
advertisement
कोकणात कसं राहील हवामान?
आज मुंबईसह परिसरात थंडी जवळपास पूर्णपणे नाहीशी झाली आहे. सकाळी फारसा गारवा जाणवणार नाही आणि दुपारी उकाडा जाणवेल. हवामान कोरडे आणि निरभ्र राहील. कमाल तापमान सुमारे 32 ते 35 अंश सेल्सिअसदरम्यान राहील, तर किमान तापमान 23 ते 25 अंश सेल्सिअसच्या आसपास राहील. पुढील काही दिवसांतही उष्णतेची तीव्रता अशीच राहणार आहे. पुणे, सातारा, सांगली, सोलापूर आणि आसपासच्या भागांमध्ये सकाळी थोडा गारवा जाणवेल, मात्र दुपारी सूर्यप्रकाशामुळे वातावरण चांगलेच तापलेले राहील. कालच्या तुलनेत आज तापमान अधिक राहील. कमाल तापमान 32 ते 34 अंश सेल्सअस राहण्याची शक्यता आहे.
नेमकं काय घडतंय हवामानात?
सध्या डोंगराळ भागात एक 'वेस्टर्न डिस्टरबेंस' सक्रिय आहे, ज्याचा परिणाम म्हणून राजस्थान आणि पंजाबच्या वर चक्राकार वारे वाहत आहेत. यामुळे वाऱ्यांची दिशा बदलली असून दिल्ली, हरियाणा आणि राजस्थानमध्ये तापमानाचा पारा वाढला आहे. ही उष्णता येणाऱ्या वादळाचे संकेत मानले जात आहेत. महाराष्ट्रावर पुन्हा ढगाळ हवामान आणि हलक्या स्वरुपाचा पाऊस पडण्याची शक्यता वर्तवली जात आहे.
१७ ते १९ फेब्रुवारी: धोक्याची घंटा!
हवामान तज्ज्ञांच्या मते, १६ फेब्रुवारीच्या रात्रीपासून हवामानात मोठा बदल होईल. अरबी समुद्रातून येणाऱ्या बाष्पयुक्त वाऱ्यांमुळे १७ आणि १८ फेब्रुवारीला पंजाब, हरियाणा, दिल्ली, राजस्थान आणि मध्य प्रदेशात जोरदार पावसाची शक्यता आहे. १८ आणि १९ फेब्रुवारीला हा पाऊस उत्तर प्रदेशाच्या पूर्व भागाकडे सरकेल.त्यामुळे महाराष्ट्रातील काही ठिकाणी तुरळक पाऊस किंवा अंशत: ढगाळ हवामान राहील.
