जालना : अयोध्या येथे प्रभू श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाल्यानंतर संपूर्ण देश श्रीरामांच्या भक्ती मध्ये नाहून निघाला. घरोघरी दिवे लावून दिवाळी देखील साजरी झाली. अयोध्या येथे जाऊन श्रीरामांचे दर्शन घेण्याची प्रत्येकाची इच्छा आहे. मात्र, असे असताना प्रत्येकाला अयोध्येला जाणं शक्य होणार नाही हीच गोष्ट लक्षात घेऊन एका व्यक्तीने स्वखर्चातून श्रीरामांच्या भव्य मंदिराची उभारणी केली आहे.
advertisement
हे मंदिर कुठे तयार करण्यात आले, हे मंदिर उभा करण्याची कल्पना कशी सुचली आणि हे मंदिर उभं करण्यासाठी त्यांना किती खर्च आला, हे जाणून घेऊयात.
जालना तालुक्यातील पिरकल्याण येथील रहिवासी असलेल्या अॅडव्होकेट एकनाथ शिंदे यांनी गावातच हे राम मंदिर बांधले आहे. एकनाथ शिंदे हे जालना येथील जिल्हा न्यायालयात वकिलीची प्रॅक्टिस करतात. नुकतीच अयोध्या येथे प्रमुख श्रीरामचंद्रांची प्राणप्रतिष्ठा झाली आहे. तोच मुहूर्त साधून पीर कल्याण येथे 22 जानेवारी रोजी श्रीराम मंदिरामध्ये श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा करण्यात आली.
गावात असलेलं श्रीरामांचे मंदिर अतिशय वाईट अवस्थेमध्ये होते. त्यामुळे गावात एखादे श्रीरामांचे भव्य मंदिर असावे, अशी शिंदे यांच्या वडिलांची इच्छा होती. त्यामुळे या मंदिराची उभारणी केल्याचे एकनाथ शिंदे सांगतात.
हे मंदिर बांधण्यासाठी तब्बल 40 ते 50 लाखांचा खर्च आला आहे. हा संपूर्ण खर्च एकनाथ शिंदे यांनी स्वखर्चातून केला आहे. मंदिराचे बांधकाम तसेच प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला गावकऱ्यांनी देखील मोलाची साथ दिली. कधीकाळी मोलमजुरी करून उदरनिर्वाह करणाऱ्या शिंदे कुटुंब आता संपन्न झाले आहे. त्यामुळे त्यांनी प्रभू श्रीराम चरणांच्या भक्तीत लीन होत स्वखर्चातून भव्यदिव्य मंदिर बांधण्याचा निर्णय घेतला.
गावातील प्रत्येक जण अयोध्येला जाऊन श्रीरामांचे दर्शन घेऊ शकणार नाही. त्यामुळे त्यांना गावातच रामाचे दर्शन व्हावे म्हणून आपण हे मंदिर बांधल्याचं एकनाथ शिंदे यांनी सांगितलं. त्याचबरोबर श्रीरामांच्या मूर्तीची प्राणप्रतिष्ठा आपल्या हाताने झाल्याचा आनंद असल्याचे देखील ते म्हणाले.
अॅडव्होकेट एकनाथ शिंदे यांनी हे मंदिर स्वखर्चातून बांधलं असलं तरी सर्व गावकऱ्यांसाठी हे मंदिर दर्शनासाठी खुले असणार आहे. एकनाथ शिंदे यांनी बांधलेल्या या मंदिरामुळे गावकरी देखील अतिशय आनंदी आहे. गावकऱ्यांना आता गावातच प्रभू श्रीरामांचे दर्शन घेणे शक्य होणार आहे.
राजस्थानातून मागवल्या मूर्ती -
येथील श्रीराम मंदिरामध्ये असलेल्या राम, लक्ष्मण आणि सीता यांच्या मूर्ती ह्या राजस्थानातील जयपूर इथून मागवण्यात आले आहेत. या मूर्तींचे वैशिष्ट्य म्हणजे सगळ्या मूर्ती या एकाच दगडात घडवण्यात आले आहेत, असेही त्यांनी सांगितले.