भारताविरुद्धच्या सामन्यावर बहिष्कार टाकण्याची धमकी देताना पाकिस्तानने केलेल्या मागण्यांमध्ये हस्तांदोलन हा मुद्दा होता. लाहोरच्या बैठकीत, आयसीसीचे उपाध्यक्ष इम्रान ख्वाजा आणि असोसिएट सदस्यांचे प्रतिनिधी मुबाशिर उस्मानी यांना सांगण्यात आले की 15 फेब्रुवारी रोजी सामना खेळण्याच्या बदल्यात पाकिस्तानला तीन गोष्टी हव्या आहेत.
हस्तांदोलन होणार नाही
भारत आणि पाकिस्तानमधील "नो-हँडशेक" ची ही मालिका वर्ल्ड कपमध्येही सुरू राहणार आहे. गेल्या वर्षी आशिया कपमध्ये पाकिस्तानला हरवल्यानंतर भारताने सामन्यानंतर लगेचच हस्तांदोलन न करता मैदान सोडले होते. त्या स्पर्धेत भारत आणि पाकिस्तानने तीन सामने खेळले आणि त्यापैकी एकाही सामन्यात खेळाडूंनी हस्तांदोलन केले नाही. शिवाय, भारतीय टीमने एसीसी आणि पीसीबी प्रमुख मोहसीन नक्वी यांच्याकडून आशिया कप ट्रॉफी स्वीकारण्यासही नकार दिला. त्यानंतरही ही भूमिका कायम ठेवण्यात आली.
advertisement
महिला वर्ल्ड कप, आशिया कप रायझिंग स्टार्स स्पर्धा आणि नुकत्याच संपलेल्या अंडर19 वर्ल्ड कपमध्ये भारतीय टीमने हस्तांदोलन केलं नाही. कोलंबोमध्ये होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपच्या सामन्यातही टीम इंडियाची हीच भूमिका असणार आहे. हस्तांदोलन ही एक परंपरा आहे, आवश्यकता नाही. कोणत्याही नियमांनुसार खेळाडूंना असे करण्यास भाग पाडले जाऊ शकत नाही, असे बोर्डाचे म्हणणे आहे.
पाकिस्तानची मागणी धुडकावली
रविवारी लाहोरमध्ये आयसीसी अधिकाऱ्यांसोबत झालेल्या बैठकीत पाकिस्तान क्रिकेट बोर्डाने भारताशी हस्तांदोलन करण्याचा मुद्दा उपस्थित केला. पीसीबीचे अध्यक्ष मोहसीन नक्वी यांनी खेळाडू आणि सपोर्ट स्टाफमध्ये हस्तांदोलन परत करण्याची मागणी केली आहे हे खिलाडूवृत्तीचे प्रतीक असल्याचे नक्वी यांनी म्हटले आहे. पण, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार आयसीसी हस्तक्षेप करण्याच्या मनःस्थितीत नाही. एमसीसीचा "स्पिरिट ऑफ क्रिकेट" आदराबद्दल बोलतो, नियमाबद्दल नाही. हस्तांदोलन ही एक परंपरा आहे, नियम नाही. म्हणूनच, भारत पहलगाम दहशतवादी हल्ल्यानंतर घेतलेली आपली भूमिका कायम ठेवणार आहे.
