लोकसभेतील विरोधी पक्षनेते राहुल गांधी भागवत धर्माची पताका खांद्यावर घेणार आहेत. राहुल गांधी 14 जुलैला वारीत सहभागी होणार आहेत. शरद पवारांनी दिलेलं निमंत्रण राहुल गांधींनी स्वीकारलं. मात्र आता जोरदार राजकारण सुरू झालं आहे. शरद पवारांना हा अधिकार कुणी दिला? असा सवाल भाजपच्या अध्यात्मिक आघाडीचे प्रमुख आचार्य तुषार भोसलेंनी उपस्थित केला आहे. तर भाजपचे माजी खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी, पालखी सोहळ्यात कॅटवॉक करण्यापेक्षा पालखी मुक्कामी येऊन दर्शन घ्या, अशा परखड भाषेत राहुल गांधींना सुनावलं आहे.
advertisement
रणजितसिंह नाईक निंबाळकरांना लोकसभा निवडणुकीत पराभूत करणारे खासदार धैर्यशील मोहिते पाटील यांनी निंबाळकरांचा खरपूस समाचार घेतला. राष्ट्रीय पातळीवरील नेता महाराष्ट्राची संस्कृती बघायला येत असेल तर त्यांचं स्वागतच केलं पाहिजे, असे खडेबोल मोहिते पाटलांनी सुनावले. निंबाळकर अजूनही पराभवाच्या धक्क्यातून सावरले नाहीत, असा जोरदार टोलाही मोहिते पाटलांनी लगावला. तर निवडणुकीत पराभूत झालेल्या रणजितसिंह नाईक निंबाळकरांच्या मताला किती महत्त्व द्यायचं, अशा तिखट शब्दात रोहित पवारांनी तोफ डागली. तर काँग्रेसचे नेते आणि विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी भाजपला राहुल गांधींची भीती वाटत असल्याचा टोला लगावला. मोगलांच्या घोड्यांना पाण्यातही जसे संताजी-धनाजी दिसायचे तशीच स्थिती भाजपची झाली असून त्यांना सर्वत्र राहुल गांधी दिसत असल्याची खोचक टीका विजय वडेट्टीवार यांनी केली.
शरद पवारांनी 2 जुलै रोजी दिल्लीत राहुल गांधींची भेट घेतली होती. त्या भेटीत शरद पवार आणि महाराष्ट्रातील खासदारांनी राहुल गांधींना वारीत सहभागी होण्याचं निमंत्रण दिलं होतं. ते निमंत्रण स्वीकारून राहुल गांधी 14 तारखेला वारीत सहभागी होणार आहेत. भाजपच्या अध्यात्मिक आघाडीनंतर भाजपच्या नेत्यांनीही तोफ डागायला सुरूवात केली आहे. त्यामुळे सत्ताधारी आणि विरोधक आमनेसामने आले आहेत. एकंदरीतच विधानसभा निवडणुकीच्या तोंडावर राहुल गांधी वारी करत असल्यामुळे त्यांची वारीची वाट राजकीय मार्गाकडे वाटचाल करत असल्याची टीका केली जात आहे.
गांधी कुटुंबातील कोणत्याही व्यक्तीनं आतापर्यंत वारीत सहभाग घेतलेला नाही. त्यामुळे वारीत सहभागी होणारे राहुल गांधी हे त्यांच्या कुटुंबातील पहिलेच वारकरी ठरणार आहेत. भारत जोडो यात्रेच्या दरम्यान राहुल गांधींनी शेगावमध्ये गजानन महाराजांच्या समाधीचं दर्शन घेतलं होतं. तसंच तिथला प्रसादही ग्रहन केला होता. आता राहुल गांधी वारीत सहभागी होणार आहेत. त्यामुळे आतापासूनच राजकारण सुरू झालं आहे. विधानसभा निवडणुका जवळ आलेल्या असल्यामुळे सॉफ्ट हिंदुत्वासाठी राहुल गांधी वारी करत आहेत का? हाच प्रश्न आता निर्माण झाला आहे.