'बालभारती'च्या गाण्याला लोकप्रिय गायिका वैशाली सामंतचा आवाज लाभला असून अवधूत गुप्तेने संगीत दिलं आहे. तर दासू वैद्य यांनी ह्या गाण्याला शब्द दिले आहेत. या गाण्याच्या माध्यमातून बालभारतीच्या पुस्तकासोबत प्रत्येकाच्या जोडलेल्या आठवणी आणि भावना या गाण्यातून सुंदरपणे उलगडण्यात आले आहेत. सध्या या गाण्याची प्रेक्षकांमध्ये चांगलीच चर्चा सुरू आहे. २७ जानेवारी २०२७ रोजी 'बालभारती' पुस्तकाला ६० वर्षे पूर्ण झाली त्यानिमित्त हे गाणं रिलीज करण्यात आलं आहे. बालभारती हे पुस्तक शालेय विद्यार्थ्यांसाठी केवळ अभ्यासाचं साधन नसून बालपणाचा कोवळा उजेड, संस्कारांची शिदोरी आणि कल्पनाशक्तीला पंख देणारं आहे.
advertisement
'बालभारती' हे गाणं ऐकताना आणि पाहताना तुम्हाला नकळत शाळेतल्या जीवनाची आठवण करून देईल. बालपणीच्या आठवणी, पुस्तकांचा सुगंध आणि पुस्तकावरील बोलकी चित्र अशा सर्व आठवणी आपसुकच आपल्या नजरेसमोरून जातील. 'बालभारती' पुस्तकातून प्रत्येकाने आपल्या शाळेमध्ये अभ्यास केला आहे. 'बालभारती' म्हणजेच मराठी विषय. अनेक कवींच्या कविता आणि अनेक लेखकांचे धडे आपण या पुस्तकातून शिकलो आहोत. अगदी लिहिण्यापासून वाचणापर्यंत आपण 'बालभारती'चा आधार घेतला आहे. दरम्यान, बालभारतीच्या पुस्तकांनी दिलेले संस्कार, कल्पनाशक्ती आणि ज्ञानप्रवास हा प्रत्येक विद्यार्थ्याच्या मनात घर करून आहे.
