तर हा रंजक किस्सा आहे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिलेल्या प्रकाशचंद्र सेठी यांच्याबद्दल. प्रकाशचंद्र सेठी हे मध्य प्रदेशचे एकेकाळचे सर्वात लोकप्रिय मुख्यमंत्री होते. ते इंदिरा गांधींचे जवळचे मानले जात. यामुळेच ते आपला बहुतेक वेळ दिल्लीत घालवायचे. श्यामा चरण शुक्ल यांच्यानंतर, जानेवारी १९७२ मध्ये प्रकाशचंद्र सेठी मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री झाले. त्यांच्याबद्दल असे म्हटलं जातं की त्यांनी नाईट ड्रेस आणण्यासाठी थेट जम्मू आणि काश्मीरहून भोपाळला सरकारी विमान पाठवलं होतं.
advertisement
खरं तर, मुख्यमंत्रीपदाची सुत्रं हाती घेतल्यानंतर प्रकाशचंद्र सेठी अनेकदा विविध कारणांसाठी चर्चेत असायचे. कधी ते त्यांच्या कठोर शब्दांसाठी तर कधी त्यांच्या वादग्रस्त निर्णयासाठी ओळखले जायचे. ८० च्या दशकात मध्य प्रदेशच्या दऱ्याखोऱ्यांमध्ये दरोडेखोरांची प्रचंड दहशत होती. त्यांची ही दहशत मोडून काढण्यासाठी सेठी यांनी थेट दरोडेखोरांच्या अड्ड्यांवर हवाई दलाने बॉम्ब टाकावेत, असं विचित्र वक्तव्य केलं होतं. यावरून सेठी यांच्या अशा बेधडक स्वभावामुळे ते सर्वांपेक्षा वेगळे ठरत होते. इंदिरा गांधींशी जवळीक असल्याने त्यांचा थाट वेगळाच होता. ते बहुतेक वेळा हवाई प्रवास करायचे. मुख्यमंत्री झाल्यानंतर ते फक्त सरकारी विमानानेच प्रवास करत असत. एम एन बुच यांच्या 'व्हेन द हार्वेस्ट मून इज ब्लू' या पुस्तकात एका घटनेचा उल्लेख आहे.
प्रकाश चंद्र सेठी गुलाम नबी आझाद यांच्या लग्नासाठी काश्मिरला गेले
मुख्यमंत्री झाल्यानंतर काही काळाने प्रकाश चंद्र सेठी हे काँग्रेसचे दिग्गज नेते गुलाम नबी आझाद यांच्या लग्नाला हजेरी लावण्यासाठी जम्मू आणि काश्मीरला गेले होते. लग्नाला उपस्थित राहिल्यानंतर ते त्याच रात्री परत भोपाळला येणार होते. तिथे रात्री मुक्कामी राहण्याचा त्यांचा काहीही प्लॅन नव्हता. पण काही कारणास्तव त्यांना रात्री तिथेच राहावे लागले. काहीच प्लॅन नसताना त्यांना तिथे राहावं लागल्याने साहजिकच त्यांनी सोबत आपला नाईट ड्रेस नेला नव्हता. त्यामुळे नाईट ड्रेस नसताना रात्र कशी काढायची? अशा विचित्र परिस्थितीत सापडले होते.
नाईट ड्रेस आणण्यासाठी भोपाळला पाठवलं सरकारी विमान
यानंतर तत्कालीन मुख्यमंत्री प्रकाश चंद्र सेठी यांनी भोपाळला सरकारी विमान पाठवले. सरकारी विमानाचा पायलट भोपाळहून त्यांचा नाईट ड्रेस घेऊन पुन्हा काश्मीरला गेला. प्रकाश चंद्र सेठींची ही कहाणी अजूनही मध्य प्रदेशात चर्चेत आहे.
प्रकाश चंद्र सेठी कोण आहेत?
प्रकाश चंद्र सेठी हे एकेकाळचे काँग्रेसचे मातब्बर नेते होते. त्यांचा जन्म १९ ऑक्टोबर १९२० रोजी राजस्थानच्या झालार जिल्ह्यातील झालरापटन येथे झाला. ते २९ जानेवारी १९७२ ते २२ डिसेंबर १९७५ पर्यंत असं दोन वेळा मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री राहिले. २ सप्टेंबर १९८२ ते १९ जुलै १९८४ या काळात ते देशाचे गृहमंत्री देखील होते. सेठी यांनी १९३९ मध्ये उज्जैनमधील माधव महाविद्यालयातून आपल्या राजकीय कारकिर्दीची सुरुवात केली होते.
हेही वाचा
11 जणांना जिवंत जाळलं, कमरेपर्यंत पाणी, हत्तीवर बसून आल्या इंदिरा गांधी, देशाचं राजकारण बदलवणारी घटना!
ज्या ज्या वेळी देशात सत्तापालट झाली, त्या त्या वेळी या सत्तापालटाची सुरुवात बिहारमधून झाल्याचं म्हटलं जातं. आणीबाणीनंतर इंदिरा गांधींनी देखील याच राज्यातून सत्तेत कमबॅक केलं होतं. सविस्तर लेख वाचण्यासाठी इथे क्लिक करा