वाद कसा सुरू झाला?
उत्तर प्रदेश सरकारने कावड यात्रेच्या मार्गावरच्या दुकानदारांना स्वतःचं नाव स्पष्टपणे लिहिण्याचे आदेश दिले होते. त्यातच प्रशासन नामफलक जबरदस्तीने लावत असल्याच्या बातम्या पश्चिम उत्तर प्रदेशातून येत होत्या. यावरून राजकीय वाद सुरू झाले. एका पक्षाने सरकारवर धार्मिक भेदभावाचा आरोप केला. योगी सरकारच्या या निर्णयामागे मुझफ्फरनगरमध्ये आश्रम असलेल्या स्वामी यशवीर महाराज कारणीभूत होते. कावड यात्रेपूर्वी दुकानांना नामफलक लावला नाही तर मी स्वतः त्यांना त्यासाठी भाग पाडणार, असा इशारा त्यांनी दिला होता.
advertisement
यशवीर स्वामी कोण आहेत?
मुझफ्फरनगरपासून 15 किलोमीटर अंतरावर असलेल्या बघरा गावात स्वामी यशवीर महाराज यांचा आश्रम आहे. योगसाधना यशवीर आश्रम असं त्याचं नाव आहे. बीबीसी हिंदीच्या वृत्तानुसार, या आश्रमात स्वामी यशवीर यांच्या व्यतिरिक्त त्यांचे शिष्य ब्रह्मचारी स्वामी मृगेंद्र स्वामी राहतात. हे त्यांचा उजवा हात मानला जातात. कडक तपासणीनंतर लोकांना या आश्रमात प्रवेश दिला जातो. स्वामी यशवीर यांचा जन्म मुझफ्फरनगरमधल्या एका जाट कुटुंबात झाला. संन्यास घेण्यापूर्वी त्यांचं नाव काय होतं, त्यांच्या आई-वडिलांचं नाव काय आहे, याची माहिती मिळत नाही. कुटुंबाविषयी विचारलं असता, 'संतांना खासगी प्रश्न विचारले जात नाहीत,' असं उत्तर ते देतात. 'मी लहानपणी माझं घरदार सोडलं. तेव्हापासून मी कुटुंबाच्या संपर्कात नाही,' असा दावा स्वामी यशवीर यांनी केला आहे.
या आश्रमात काय होतं?
योगसाधना यशवीर आश्रम स्थापनेपूर्वी स्वामी यशवीर हरियाणातल्या अनेक जिल्ह्यांमध्ये राहून योग शिकले. त्यानंतर दोन दशकांपूर्वी ते बघरा गावात कायमस्वरूपी स्थायिक झाले. या आश्रमात योगाचं शिक्षण दिलं जातं. तिथे दर वर्षी एका होमाचं आयोजन केलं जातं. त्यात मोठ्या प्रमाणावर लोक सहभागी होतात.
सपा सरकारच्या काळात का गेले होते तुरुंगात?
भगवी वस्त्रं परिधान करणारे आणि कपाळावर गोलाकार टिळा लावणारे स्वामी यशवीर कायम चर्चेत असतात. वादांशी त्यांचा जुना संबंध आहे. 2015मध्ये एका पंचायतीमध्ये प्रेषित मोहम्मद यांच्यावर वादग्रस्त टिप्पणी केल्याचा आरोप त्यांच्यावर होता. यानंतर त्यांच्यावर धार्मिक भावना भडकावल्याप्रकरणी गुन्हा दाखल करून त्यांना अटक करण्यात आली. या प्रकरणात स्वामी यशवीर सुमारे साडेसात महिने तुरुंगात होते. त्या वेळी उत्तर प्रदेशात समाजवादी पक्षाचं सरकार होतं. त्यांच्यावर राष्ट्रीय सुरक्षा कायदा अर्थात एनएसएदेखील लागू करण्यात आला होता. ऑगस्ट 2016 मध्ये रासुका हटवल्यावर त्यांना जामीन मिळाला होता.
'घरवापसी'साठी अभियान
स्वामी यशवीर 'घरवापसी' अभियान चालवतात. इतर धर्मातून हिंदू धर्मात प्रवेश करणाऱ्या लोकांसाठी ते शुद्धीकरण हवन करतात. आतापर्यंत एक हजारांहून अधिक मुस्लिमांची 'घरवापसी' केल्याचा दावा त्यांनी केला आहे. 'बीबीसी हिंदी'ला दिलेल्या मुलाखतीत त्यांनी सांगितलं, की 'दुकानांबाहेर नामफलक लावण्याच्या मुद्द्यावर माझं उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ आणि उत्तराखंडच्या मुख्यमंत्र्यांशी बोलणं झालं होतं. आम्ही तुमच्यासोबत असल्याचं आश्वासन त्यांनी दिलं होतं. मी मुस्लिमांच्या विरोधात नसून, धार्मिक अशुद्धतेच्या विरोधात आहे.'
राजकीय पार्श्वभूमी
स्वामी यशवीर यांचा परिसरात चांगला संपर्क आहे. त्यांना 2022मध्ये यूपीच्या विधानसभा निवडणुकीत चरथावल मतदारसंघातून निवडणूक लढवायची होती. त्यांनी तिकिटासाठी जोरदार मोहीम राबवली होती; पण त्यांना उमेदवारी मिळाली नाही. 'देवाची इ्च्छा असेल तर माझी राजकीय अपेक्षा पूर्ण होईल,' असं ते म्हणतात. स्वामी यशवीर यांनी मागच्या वर्षी जमियत उलेमा ए हिंदचे नेते अर्शद मदनी आणि महमूग मदनी यांच्याविरुद्ध मोहीम उघडून त्यांना खुल्या चर्चेचं आव्हान दिलं होतं. ते देवबंदच्या दिशेने निघाले होते; पण पोलिसांनी त्यांना मुझफ्फरनगरमध्ये रोखलं होतं.