टाइम्स ऑफ इंडिया या वृत्तपत्रात जय भीम घोषणेबाबत एक वृत्त प्रसिद्ध करण्यात आलं आहे. या वृत्तानुसार, जवाहरलाल नेहरू युनिव्हर्सिटीतल्या स्कूल ऑफ सोशल सायन्सेसमधल्या सेंटर फॉर स्टडी ऑफ सोशल सिस्टीममधले प्रोफेसर विवेक कुमार म्हणतात, की भीमा कोरेगावच्या लढाईत हा शब्द पहिल्यांदा वापरण्यात आला होता. हे युद्ध 1 जानेवारी 1818 रोजी मराठा पेशवे आणि ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनी यांच्यात लढलं गेलं होतं.
advertisement
कुमार यांनी दिलेल्या माहितीनुसार, भीमा कोरेगावच्या युद्धादरम्यान महार सैनिक ब्रिटिश इस्ट इंडिया कंपनीच्या वतीने लढले होते. हे सैनिक जेव्हा भीमा नदी ओलांडत होते तेव्हा त्यांनी स्वतःला प्रेरित करण्यासाठी जय भीम असा जयघोष केला होता. ब्रिटिशांच्या वतीने लढणाऱ्या महार सैन्याने पेशव्यांचा पराभव केला होता. या कारणास्तव ते विजयाचे प्रतीक बनले. यानंतर बाबासाहेब भीमराव आंबेडकर दर वर्षी या ठिकाणाला भेट देत होते. भीमा कोरेगावचं मैदान पुणे जिल्ह्यात आहे. या युद्धात मारल्या गेलेल्या महार सैनिकांना श्रद्धांजली वाहण्यासाठी अजूनही दर वर्षी येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होते.
विवेक कुमार यांनी या शब्दामागची आणखी एक कथा सांगितली आहे. 1936मध्ये स्वतंत्र मजूर पक्षाची स्थापना झाल्यानंतर मुंबईतल्या चाळ परिसरात आंबेडकरांच्या जयंती सोहळ्याचं आयोजन करण्यात आलं होतं. या सोहळ्यात 'जय भीम'चा जयघोष करून शुभेच्छा देण्यात आल्या होत्या. तेव्हापासून या घोषणेचा वापर वाढत गेला.
'जय हिंद'पेक्षा जुनी आहे जय भीम घोषणा
1956मध्ये आंबेडकरांच्या मृत्यूनंतर चळवळीच्या रूपात जय भीमची लोकप्रियता वाढल्याचे प्राध्यापक विवेक कुमार यांनी सांगितलं. त्यांच्या मते, जय भीम ही घोषणा जय हिंदपेक्षा जुनी आहे.
या संदर्भात आणखी एक तज्ज्ञ आणि दलित विषयांचे अभ्यासक कंवल भारती म्हणतात, की हिंदी भाषिक प्रदेशांमध्ये जय भीम ही घोषणा 1960च्या दशकात लोकप्रिय झाली. भारती याचं श्रेय कवी बिहारीलाल 'हरित' यांना देतात. या कवीने दिल्लीत पहिल्यांदा हा शब्द वापरला होता.
जमनादास यांना लिहिलेल्या पत्राचा दाखला देत भारती म्हणतात की, पीटी रामटेके यांनी त्यांच्या शोधनिबंधात जय भीमच्या उगमाबद्दल लिहिलं आहे. 'जय भीमचे जनक – बाबू हरदास एन.एन.' असं या शोधनिबंधाचं शीर्षक आहे. हा शोधनिबंध 2000 साली प्रकाशित झाला होता. या शोधनिबंधात हरदास यांना जय भीमची कल्पना कशी सुचली हे सांगितलं गेलं आहे.
हरदास यांना जय रामपतीचा उच्चार चांगला वाटत नव्हता. हरदास आमदार झाल्यानंतर जय रामपती या शब्दांनी स्वागत करण्यात आलं होतं. तिथे एका मौलवीने त्यांना सलाम एलेकुन या मुस्लिमांमधल्या अभिवादन पद्धतीबद्दल सांगितलं. यावरून हरदास यांना जय भीमची कल्पना सुचली.
हरदास यांनी ठरवलं की, जय भीमचं उत्तर बाल भीमने दिलं जाईल. यानंतर ही घोषणा भीम विजय संघाच्या कार्यकर्त्यांमध्ये अभिवादन म्हणून वापरली गेली. पण, नंतर बाल भीम काढून टाकण्यात आलं आणि जय भीमला जय भीमने उत्तर देण्यास सुरुवात झाली. भारती म्हणतात की, यामुळे हरदास यांना जय भीमचं संस्थापक मानलं पाहिजे.
1939 मध्ये वयाच्या अवघ्या 35व्या वर्षी हरदास यांचं निधन झालं. भारती यांनी दिलेल्या माहितीप्रमाणे, हरदास यांनी मृत्यूपूर्वी ही घोषणा दिली होती. अशा स्थितीत जय भीमचा शोध हा जय हिंदच्या आधी लागला असं म्हणता येईल.