राष्ट्रवादीच्या शरदचंद्र पवार पक्षाच्या नेत्या, खासदार सुप्रिया सुळे यांनीही आर्थिक आधारावरील आरक्षणाचा मुद्दा प्रकर्षाने अधोरेखित केला. ज्यांची आर्थिक परिस्थिती वाईट आहे, त्यांना आरक्षण मिळायला हवे, अशा आशयाचे वक्तव्य त्यांनी केले होते. त्यांच्याच पावलावर पाऊल टाकत अजित पवार यांनी आरक्षणाला गरिबीशी जोडण्याचा प्रयत्न केला.
अजित पवार नेमके काय म्हणाले?
मी राजकारण करताना जातीपातीचा, नात्यागोत्याचा विचार करीत नाही. मी फक्त माझ्याकडे आलेला माणूस पाहतो आणि त्याला मदत करतो. काही लोक जातीचे वेड डोक्यात घालण्याचे काम करतात आणि समाजात तेढ निर्माण करण्याचे प्रयत्न करतात. आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळायला पाहिजे, याच्याशी आमचे दुमत असण्याचे कुणाचेच कारण नाही, असे अजित पवार म्हणाले. ते बीड जिल्ह्यात बोलत होते.
advertisement
छगन भुजबळ म्हणाले, आरक्षण म्हणजे गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही
राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी जरी आर्थिक परिस्थितीनुसार आरक्षण मिळायला पाहिजे, असे म्हटलेले असले तरी मी त्यांच्या मताशी सहमत नाही. आरक्षण हा गरिबी हटविण्याचा कार्यक्रम नाही, असे म्हणत छगन भुजबळ यांनी अजित पवार यांच्यावर पलटवार केला. जे गरीब आहेत त्यांना आपण अन्यधान्य, घरे देतो. आरक्षणाचे मूळ हे सामाजिकदृष्ट्या मागास आहेत का, हेच आहे, असेही भुजबळ म्हणाले.
अजित पवार यांच्या वक्तव्यानंतर पत्रकारांनी प्रश्न विचारला असता, जातीय सलोखा कायम राहण्यासाठी आपण बोललो, असे ते म्हणाले. देशाला स्वातंत्र्य मिळून ७५ वर्षे झाले तरीही आज काही समाज मागे राहिला आहे. दुसरीकडे काही समाज आरक्षणाची मागणी करीत आहेत.तुम्ही मागणीच करू नका, असे लोकशाही राज्यात मी त्यांना सांगू शकत नाही, असेही ते म्हणाले.