फाल्गुन कृष्ण चतुर्दशीच्या निशीथ काळात भगवान शिवाची विशेष पूजा केली जाते. यावर्षी मध्यरात्री 12 वाजून 28 मिनिटांपासून ते 1 वाजून 18 मिनिटांपर्यंतचा कालावधी शिवपूजेसाठी विशेष मानला जात आहे. या वेळी जप, अभिषेक आणि रात्रजागरण करण्याची परंपरा आहे. ज्योतिषशास्त्रानुसार भगवान शिव हे नवग्रहांचे अधिपती मानले जातात. सर्व ग्रहांचे नियंत्रण शिवतत्त्वाखाली असल्याचे धार्मिक ग्रंथांमध्ये वर्णन आहे. विशेष म्हणजे शनीदेवांना भगवान शिवांचे शिष्य मानले जाते. त्यामुळे शनीची साडेसाती, ढैय्या किंवा शनिदोष कमी करण्यासाठी शिवपूजा करण्यावर भर दिला जातो.
advertisement
शनि आणि शिव यांचा संबंध
शनी ग्रह कर्मफलदाता मानला जातो. कुंडलीत शनि प्रतिकूल स्थितीत असल्यास विलंब, अडथळे, आर्थिक ताण किंवा मानसिक दबाव जाणवू शकतो. धार्मिक परंपरेनुसार शनीदेवांनी भगवान शिवाची कठोर तपश्चर्या केली आणि त्यानंतर त्यांना विशेष स्थान प्राप्त झाले. म्हणूनच शनिपीडा कमी करण्यासाठी महाशिवरात्रीच्या दिवशी शिवलिंगावर जलाभिषेक, काळे तिळ अर्पण आणि “ॐ नमः शिवाय” मंत्रजप करण्याची प्रथा आहे.
राहू-केतू आणि शिवतत्त्व
राहू आणि केतू हे छाया ग्रह मानले जातात. कालसर्प दोष, अचानक अडचणी, मानसिक अस्थिरता किंवा निर्णयांमध्ये गोंधळ अशा गोष्टी राहू-केतूच्या प्रभावाशी जोडल्या जातात. पुराणानुसार समुद्रमंथनानंतर राहू-केतूची उत्पत्ती झाली आणि त्यांचे प्रभाव संतुलित ठेवण्याचे कार्य शिवतत्त्वाशी संबंधित मानले गेले. त्यामुळे राहू-केतू दोष शांतीसाठी महामृत्युंजय मंत्र, पंचाक्षरी मंत्र आणि रुद्राभिषेक करण्याची परंपरा आहे.
नवग्रह आणि महादेव
नवग्रहांमध्ये सूर्य, चंद्र, मंगळ, बुध, गुरु, शुक्र, शनि, राहू आणि केतू यांचा समावेश होतो. धार्मिक श्रद्धेनुसार हे सर्व ग्रह भगवान शिवांच्या अधीन कार्य करतात. म्हणून महाशिवरात्रीला केलेली शिवआराधना ही सर्व ग्रहांच्या संतुलनासाठी महत्त्वाची मानली जाते.





