नेमकी घटना काय?
भोपाळच्या निशादपुरा परिसरात एका रिकाम्या घराच्या सेप्टिक टॅंकमध्ये लोखंडी पेटी आढळली. या पेटीतून दुर्गंधी येत असल्याने स्थानिकांनी पोलिसांना माहिती दिली. पोलिसांनी घटनास्थळी धाव घेऊन पेटी उघडली असता, त्यात एका महिलेचा कुजलेल्या अवस्थेतील मृतदेह सापडला. तपासाअंती या महिलेची ओळख अशरफी ऊर्फ सिया (वय ३३) म्हणून पटली.
इन्स्टाग्रामवर प्रेम
advertisement
सिया आणि मुख्य आरोपी समीर यांची ओळख सुमारे एक वर्षापूर्वी इन्स्टाग्रामवर झाली होती. मैत्रीचे रूपांतर प्रेमात झाले आणि ३ महिन्यांपूर्वी सिया तिचे मूळ गाव गोंदिया सोडून भोपाळला समीरसोबत राहण्यासाठी आली. मात्र, समीर आधीच विवाहित होता आणि त्याला दोन मुले होती. यामुळे समीरची पत्नी आणि सिया यांच्यात सतत भांडणे होऊ लागली. वाद इतका विकोपाला गेला की समीरची पत्नी घर सोडून जबलपूरला आपल्या माहेरी निघून गेली.
तपासात असं समोर आलं की, सियाने समीरवर लग्नासाठी दबाव टाकण्यास सुरुवात केली होती. लग्न न केल्यास ५ लाख रुपयांची मागणी तिने केली. अन्यथा कायदेशीर कारवाई करण्याची धमकी दिली होती. घटनेच्या दिवशी सोमवारी (९ जानेवारी) यावरून दोघांमध्ये पुन्हा जोरदार भांडण झाले. रागाच्या भरात समीरने सियाचा गळा आवळून तिची हत्या केली.
हत्या केल्यानंतर समीरने आपली आई, भाऊ आणि बहीण यांना घटनास्थळी बोलावले. त्यांनी मिळून पुरावे नष्ट करण्याचा प्रयत्न केला. मध्यरात्री सियाचा मृतदेह एका लोखंडी पेटीत भरून घराच्या जवळील सेप्टिक टॅंकमध्ये फेकून दिला. मृतदेह पूर्णपणे सडलेला असल्याने जखमा ओळखणे कठीण होते, मात्र सियाच्या हातावरील 'दिपक' नावाचा टॅटू आणि '२६ मे १९९२' या जन्मदिनांकामुळे तिची ओळख पटली.
सियाचे यापूर्वी झाले होते तीन विवाह
पोलीस तपासात आणखी एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. मृत सियाचे यापूर्वी महाराष्ट्र आणि राजस्थानमध्ये तीन वेळा लग्न झाले होते. समीर हा तिचा चौथा पती होता. सध्या मुख्य आरोपी समीर फरार असून, पोलिसांनी त्याच्या आईला, भावाला आणि बहिणीला अटक केली आहे. समीरच्या पत्नीचीही चौकशी सुरू असून या हत्येत कुटुंबातील आणखी सदस्यांचा सहभाग असल्याचा संशय पोलिसांनी व्यक्त केला आहे.
