जळगाव : रविवारची सुट्टी असल्याने मित्रांसह पोहण्यासाठी गेलेल्या एका 22 वर्षीय तरुणाचा पाण्याचा अंदाज न आल्याने कांताई धरणात बुडून दुर्दैवी मृत्यू झाल्याची हृदयद्रावक घटना जळगाव तालुक्यात घडली आहे . या घटनेमुळे संपूर्ण परिसरात शोककळा पसरली असून मृताच्या कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.
आशितोष दिलीपकुमार जोशी (वय २२, रा. जळगाव) असे मृत तरुणाचे नाव आहे. आज सकाळी आशितोष आपल्या काही मित्रांसह जळगाव तालुक्यातील कांताई धरण परिसरात पोहण्यासाठी गेला होता. उन्हाळ्याची चाहूल लागल्याने धरण परिसरात रविवारच्या दिवशी मोठ्या प्रमाणावर तरुणांची गर्दी असते. त्यातच आजही अनेकजण पोहण्यासाठी आले होते.
advertisement
नेमकं काय घडलं?
पोहण्याचा आनंद घेत असताना अचानक पाण्याची खोली आणि प्रवाहाचा अंदाज न आल्याने आशितोष पाण्यात बुडू लागला. त्याला बुडताना पाहताच खेडी–कडोली परिसरातील तरुणांनी प्रसंगावधान राखत तत्काळ धाव घेऊन त्याला पाण्याबाहेर काढले. मात्र तोपर्यंत उशीर झाला होत. तातडीने आशितोषला प्राथमिक उपचारासाठी एरंडोल ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणीनंतर त्याला मृत घोषित केले.
रुग्णालयात नातेवाईकांचा आक्रोश
आशितोषच्या मृत्यूची बातमी कळताच रुग्णालयात नातेवाईकांचा एकच आक्रोश झाला. आशितोषच्या अकाली मृत्यूमुळे परिसरात हळहळ व्यक्त होत असून सर्वत्र शोक व्यक्त केला जात आहे. या घटनेची माहिती मिळताच एरंडोल पोलीस ठाण्याच्या कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी तसेच रुग्णालयात धाव घेत पंचनामा केला. या प्रकरणी आकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली असून पुढील तपास सुरू आहे.
पोहायला जाताना खबरदारी घेण्याचे आवाहन
दरम्यान, धरण व नदी परिसरात पोहण्यासाठी जाणाऱ्यांनी आवश्यक ती खबरदारी घ्यावी, पाण्याच्या खोलीचा अंदाज न घेता पोहणे टाळावे, असे आवाहन प्रशासनाकडून करण्यात येत आहे.
