खरं तर, मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागात झालेल्या लाचखोरीच्या प्रकरणामुळे राज्याचं राजकारण तापलं आहे. या प्रकरणी मंत्री नरहरी झिरवाळ यांचे नाव चर्चेत आल्याने ते चांगलेच अडचणीत सापडले आहेत. विशेष म्हणजे, कारवाई झाल्यापासून झिरवाळ हे 'नॉट रिचेबल' असल्याने राजकीय वर्तुळात उलटसुलट चर्चांना उधाण आले आहे.
नेमके प्रकरण काय?
मंत्रालयातील अन्न व औषध प्रशासन विभागातील लिपिक राजेंद्र ढेरंगे याला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाने (ACB) ३५ हजार रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडले. एका मेडिकल स्टोअरचा निलंबित परवाना पुन्हा सुरू करण्यासाठी ही लाच मागण्यात आली होती. अटकेनंतर ढेरंगे याने खळबळजनक दावा केला की, त्याने ही लाच मंत्री झिरवाळ यांच्या खासगी सचिवाच्या सूचनेनुसार घेतली होती. या खुलाशामुळे थेट मंत्र्यांचे कार्यालय संशयाच्या भोऱ्यात सापडले आहे.
advertisement
झिरवाळ 'नॉट रिचेबल'; आदिवासी संमेलनाला दांडी
लाचखोरीचे प्रकरण उघडकीस आल्यानंतर नरहरी झिरवाळ यांनी त्यांचे शनिवारचे सर्व नियोजित कार्यक्रम रद्द केले. नाशिकमध्ये आयोजित पहिल्या राज्यस्तरीय आदिवासी साहित्य व सांस्कृतिक संमेलनाचे उद्घाटन झिरवाळ यांच्या हस्ते होणार होते. मात्र, ऐनवेळी ते अनुपस्थित राहिल्याने आयोजकांची मोठी तारांबळ उडाली.
राजीनाम्यासाठी विरोधक आक्रमक
विरोधी पक्षांनी या मुद्द्यावरून सरकारवर जोरदार टीका केली आहे. "मंत्रालयात मंत्र्यांच्या दालनातच भ्रष्टाचार होत असेल, तर हे सरकार नेमके कोणासाठी चालले आहे?" असा सवाल करत झिरवाळ यांच्या राजीनाम्याची मागणी केली जात आहे. दरम्यान, झिरवाळ यांनी "आपला या प्रकरणाशी संबंध सिद्ध झाला तर राजीनामा देणार" अशी भूमिका यापूर्वीच मांडली आहे.
"ज्या दिवशी ही घटना घडली, त्या दिवशी मी मुंबईत नव्हतो. या प्रकरणात माझा किंवा माझ्या कार्यालयाचा दोष आढळल्यास मी नैतिकता जपून पदावरून पायउतार होईन," असं वक्तव्य नरहरी झिरवाळ यांनी केलं आहे. शिवाय सोमवारी मुंबईत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन आपली बाजू मांडणार आहेत, असं स्पष्टीकरणही झिरवाळ यांनी दिलं आहे.
