गणेश नाईक हे फडणवीस यांच्या मंत्रिमंडळातील ज्येष्ठ मंत्री आहेत. महापालिका निवडणुकांच्यावेळी ठाणे आणि नवी मुंबईत शिंदे यांचा वारू उधळू नये, यासाठी त्यांना कोंडित पकडण्याचे काम भाजप पक्षश्रेष्ठींनी नाईक यांच्याकडे सोपवले. त्यांनीही सातत्याने एकनाथ शिंदे यांना धारेवर धरून शाब्दिक हल्ले सुरूच ठेवले. मात्र आता दोघांमधील शाब्दिक फैरींची जागा खुल्या आव्हानाने घेतली आहे.
advertisement
लोकसभेत बाप बेटे कोणीही उभे रहा, तुमची खुमखुमी उतरवतो
गणेश नाईक यांना एवढीच खुमखुमी असेल तर लोकसभेत बाप बेटे कोणीही उभे रहा, तुमची खुमखुमी उतरवतो. महायुतीतील मुख्य नेत्यांनाही विनंती आहे की यांची खुमखुमी उतरवायची आहे, उतरवू द्या. गणेश नाईक यांना स्मृतिभ्रंश झालाय. नाईकांना एकदा नाही दोन वेळा माजी केले आहे. त्यामुळे त्यांनी बोलताना विचार करावा, असे श्रीकांत शिंदे म्हणाले.
गणेश नाईक यांच्याकडून शिंदेंवरील हल्ले सुरूच
नवी मुंबईकरांच्या सुविधांसाठी रुग्णालये, उद्याने, सार्वजनिक वापरासाठी भूखंड देण्याची मागणी आपण सातत्याने करत आलो आहे. मात्र, मोकळे भूखंड नवी मुंबईकरांसाठी वापरात आणायचे सोडून बिल्डरांच्या घशात घालत आहेत. दलालांमार्फत हे काम केले जात असल्याचा गंभीर आरोप गणेश नाईक यांनी केला. यावेळी त्यांचा रोख एकनाथ शिंदे यांच्याकडे होता. माझ्या मंत्रिमंडळातील नगरविकास खात्याने अशा प्रकारचे कृत्य केले याची लाज वाटते, अशी बोचरी टीकाही गणेश नाईक यांनी गत आठवड्यात शिंदे यांच्यावर केली होती.
गणेश नाईक vs एकनाथ शिंदे यांच्यात कमालीचा संघर्ष
गणेश नाईक हे भाजपचे ज्येष्ठ नेते आणि मंत्री आहेत. ठाणे जिल्ह्यात काम करण्याचा त्यांना गेली ३० ते ३५ वर्षांचा अनुभव आहे. याच अनुभवाच्या जोरावर ठाणे जिल्ह्यातील पक्षसंघटना वाढीची जबाबदारी भाजपने गणेश नाईक यांच्या खांद्यावर दिली आहे. त्यामुळे शिवसेनेचा जोर कमी होईल, अशी व्यूह रचना आखून गणेश नाईक सातत्याने एकनाथ शिंदे यांच्याविरोधात भूमिका घेत आहेत. मग जनता दरबार असो वा जाहीर सभांमधून उघडपणे इशारा देणे असो... दोन्ही नेत्यांमधला संघर्ष टोकाला पोहोचला आहे.
