समाजसेवकावरील हल्ल्यानंतर परिस्थिती चिघळली
या वादाची ठिणगी काही दिवसांपूर्वी पडली. अलीकडेच नवी मुंबईतील समाजसेवक दिलपाक बुद्धप्रकाश यांच्यावर अज्ञात इसमांनी प्राणघातक हल्ला केला होता. या हल्ल्यात ते गंभीर जखमी झाले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. या घटनेनंतर परिसरात मोठा तणाव निर्माण झाला. परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी नवी मुंबई पोलिसांनी दोन दिवस या भागात कडक बंदोबस्त तैनात केला होता.
advertisement
बंदोबस्त हटताच पुन्हा रक्तरंजित खेळ
धक्कादायक बाब अशी की, पोलिसांनी तैनात केलेला बंदोबस्त हटवताच पुन्हा एकदा दिघा परिसरात 'गँगवार' सुरू झालं आहे. गेल्या चार दिवसांपासून दोन गट आमनेसामने येत असून, भररस्त्यात कोयते आणि तलवारी नाचवत एकमेकांवर हल्ले केले जात आहेत. या गुंडगिरीमुळे सामान्य नागरिकांना घराबाहेर पडणेही कठीण झाले आहे.
पोलिसांच्या कार्यपद्धतीवर संताप
परिसरात उघडपणे शस्त्रास्त्रांचा वापर होत असताना आणि नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण असतानाही, अद्याप एकाही आरोपीला अटक करण्यात आलेली नाही. त्यामुळे रबाळे एमआयडीसी पोलीस नेमके काय करत आहेत? असा संतप्त सवाल विचारला जात आहे. गुन्हेगारांना पोलिसांचा धाक उरला नसल्याचेच या घटनांवरून स्पष्ट होत आहे.
