तज्ज्ञ असं म्हणतात, की शेअर बाजारात जेव्हा घसरण होते, तेव्हा गुंतवणूक वाढवण्याची संधी असते. बाजारात घसरण असते, तेव्हा उत्तम फंडात एसआयपी सुरूदेखील करायला हरकत नाही. कारण शेअर बाजारात तेजी येताच, म्युच्युअल फंड गुंतवणूकदारांना चांगला रिटर्न मिळेल. शेअरची किंमत कमी असते, तेव्हा म्युच्युअल फंडात गुंतवणूक केल्यावर ग्राहकांना अधिक युनिट्स मिळतात. त्यामुळे अधिक पैसे मिळू शकतात.
advertisement
समजा, एखादी व्यक्ती दरमहा एक हजार रुपये एखाद्या म्युच्युअल फंडात गुंतवत असेल. ती व्यक्ती ज्या फंडात गुंतवणूक करत असेल, त्याच्या एका युनिटची किंमत सध्या घसरून वीस रुपयांवर आली असेल, तर एक हजार रुपयांत सुमारे 50 युनिट्स मिळतील. बाजारात तेजी असली, तर तेवढीच युनिट्स मिळायला आणखी काही काळ लागला असता.
कोरोना काळात शेअर बाजारात 40 टक्के घसरण झाली होती. तेव्हा घाबरून अनेकांनी एसआयपी थांबवली. अनेकांनी किरकोळ भावात फंडविक्री केली. कारण बाजार आणखी घसरला तर काय, याची भीती त्यांच्या मनात होती; मात्र ते गुंतवणूकदार धीराने टिकून राहिले, त्यांची गुंतवणूक वाढली आणि मोठा नफा झाला.
म्युच्युअल फंडात घसरण झाली, तर शॉर्ट टर्ममध्ये नुकसान होऊ शकतं; मात्र दीर्घ काळात कधीच नुकसान होत नाही. दीर्घ काळ म्हणजेच कमीत कमी सात वर्षं गृहीत धरली पाहिजेत. शेअर बाजारात काही काळ घसरण दिसली, तरी दीर्घ काळात बाजार चांगला परतावा देतो. त्यामुळे अशा परिस्थितीत म्युच्युअल फंडातून पैसे कधीही काढू नयेत.
अगदीच खूपच भीती वाटत असली, तर एसआयपी पॉझ करता येऊ शकते. म्हणजे एक ते सहा महिन्यांपर्यंत एसआयपी थांबवता येऊ शकते. तो काळ संपला, की पैसे पुन्हा कट होऊ लागतात. अर्थात यामुळे दीर्घकालीन विचार करता तोटा होऊ शकतो.
एसआयपी सुरू करताना फंड निवडताना सावधगिरी बाळगली पाहिजे. आर्थिक सल्लागाराची मदत घ्यावी. डायव्हर्सिफाइड पोर्टफोलिओमुळे नुकसान कमी होतं. पोर्टफोलिओमध्ये डेट फंड आणि लार्ज कॅप फंड नक्की राखावेत. कारण मिडकॅप आणि स्मॉलकॅप शेअर्समध्ये विक्रीच्या दबावामुळे फंडावरही परिणाम दिसू शकतो. त्यामुळे नुकसानही जास्त होऊ शकतं; मात्र 10 वर्षांचं उद्दिष्ट असेल, तर एसआयपी बिनधास्तपणे सुरू ठेवता येऊ शकते.
काही जण थोड्या काळासाठी, काही जण त्याहून अधिक काळासाठी किंवा काही जण दीर्घ काळासाठी गुंतवणूक करतात. काही जण मिड टर्म आणि शॉर्ट टर्मसाठी गुंतवणूक करत असतील आणि रीडीम करण्याचा काळ आला असेल आणि नुकसान होत असेल, तर काही महिने आणखी थांबणं श्रेयस्कर ठरेल. कारण बजेटनंतर बाजारात थोडी रिकव्हरी पाहायला मिळू शकते.