वक्फ बोर्ड ही मुस्लिम धर्मियांच्या धार्मिक आणि सामाजिक कल्याणासाठी स्थापन केलेली एक सरकारी संस्था आहे. राज्य वक्फ बोर्ड राज्य सरकारद्वारे स्थापन केले जाते, तर केंद्रीय वक्फ परिषद अल्पसंख्याक व्यवहार मंत्रालयाच्या प्रशासकीय नियंत्रणाखाली आहे. वक्फ बोर्ड एक कायदेशीर प्राधिकरण असते, जे मुस्लिम धर्माच्या वक्फ संपत्तीचे (धार्मिक आणि समाजोपयोगी कारणांसाठी दान केलेली मालमत्ता) व्यवस्थापन करते.
advertisement
इस्लाम धर्म मानणाऱ्या व्यक्तीने धार्मिक कार्यासाठी दिलेली जमीन म्हणजे वक्फ. दिल्लीत इस्लामिक राजवटीची सुरुवात झाल्यानंतर भारतात वक्फ मालमत्तेमध्ये टप्प्याटप्प्याने वाढ झाली , असे सांगण्यात येते. वक्फसाठी दिलेल्या जमिनी आणि मालमत्तेवर नियंत्रण ठेवण्यासाठी 'वक्फ बोर्ड' तयार करण्यात आले आहे. या जमिनीचा गैरवापर आणि अवैध मार्गाने तिची विक्री थांबवण्यासाठी वक्फ बोर्डाची निर्मिती करण्यात आली. सध्या एक केंद्रीय आणि ३२ राज्य वक्फ बोर्ड आहेत
वक्फ बोर्डाचे काम कसे चालते?
वक्फ मालमत्तेचे संरक्षण आणि व्यवस्थापन – मशिदी, दर्गे, कब्रस्ताने, मदरसे, शैक्षणिक संस्था आणि इतर समाजोपयोगी स्थळे यांची निगा राखणे. धार्मिक आणि सामाजिक प्रकल्प – मदरसे, हॉस्पिटल्स, अनाथालये यांसाठी निधी पुरवणे. मालमत्तेच्या नोंदी ठेवणे – सर्व वक्फ संपत्तींची योग्य ती नोंदणी करणे आणि त्यांचे कायदेशीर व्यवस्थापन करणे.
अनधिकृत अतिक्रमण रोखणे– वक्फ संपत्तीवर होणाऱ्या बेकायदेशीर कब्जांवर कारवाई करणे.
वित्तीय नियंत्रण – वक्फच्या उत्पन्नाचा योग्य वापर करून धर्म, शिक्षण आणि समाजोपयोगी उपक्रमांसाठी निधी वापरणे.
वक्फ बोर्डाचे प्रकार
राज्य वक्फ बोर्ड – प्रत्येक राज्यात वेगळा वक्फ बोर्ड असतो, जो त्या राज्यातील वक्फ मालमत्तेचे व्यवस्थापन करतो. केंद्रीय वक्फ परिषद – संपूर्ण देशभरातील वक्फ मालमत्तेच्या देखरेखीसाठी केंद्र सरकारच्या अखत्यारीत कार्य करणारी संस्था.
वक्फ बोर्ड धार्मिक आणि सामाजिक कल्याणासाठी एक महत्त्वाचा घटक असून, त्याचा उद्देश मुस्लिम समाजाच्या आर्थिक आणि सामाजिक उन्नतीस मदत करणे हा आहे.
महाराष्ट्रात आणि भारतात वक्फची जमीन किती आहे?
सरकारने लोकसभेत दिलेल्या माहितीनुसार डिसेंबर २०२२ पर्यंत वक्फ बोर्डाकडे एकूण ८ लाख ६५ हजारांहून अधिक मालमत्ता असून ९.४ लाख एकर जमिनींवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे. तर महाराष्ट्रात एकूण २३ हजार ५६६ मालमत्ता असून ३७ हजार ३६० हेक्टर जमिनीवर वक्फ बोर्डाचा अधिकार आहे.