PAC च्या बैठकीत RAC तिकीटधारकांच्या हक्कांवर सविस्तर चर्चा झाली. RAC तिकीट असलेल्या प्रवाशांना प्रवासात पूर्ण सीट मिळत नाही. एका बर्थवर दोन प्रवाशांना बसवले जाते, त्यामुळे रात्रीच्या प्रवासात झोप घेणेही अनेकदा कठीण होते, असे असताना या प्रवाशांकडून मात्र पूर्ण भाडे आकारले जाते, हे अन्यायकारक असल्याचे मत समितीने व्यक्त केले. त्यामुळे, RAC तिकीट कन्फर्म न झाल्यास प्रवाशांना किमान अर्धे भाडे परत देण्यात यावे, अशी ठाम शिफारस PAC ने केली आहे.
advertisement
स्वतंत्र रिफंड यंत्रणा तयार करण्याचा सल्ला
समितीने रेल्वे प्रशासनाला यासाठी स्वतंत्र रिफंड यंत्रणा तयार करण्याचा सल्ला दिला आहे. तिकीट बुकिंगच्या वेळीच RAC प्रवाशांसाठी वेगळे नियम लागू करून, कन्फर्म तिकीट न मिळाल्यास आपोआप अर्धा रिफंड मिळेल, अशी प्रणाली विकसित करावी, असेही सुचवण्यात आले आहे. यामुळे प्रवाशांचा आर्थिक भार कमी होईल आणि रेल्वेच्या सेवांबाबत विश्वास वाढेल, असे समितीचे मत आहे.
RAC तिकीटावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी
सूत्रांच्या माहितीनुसार, रेल मंत्रालय या शिफारशींवर गंभीरपणे विचार करत आहे. काही खासदारांनी हा मुद्दा थेट रेल्वेमंत्र्यांसमोरही मांडला असून, प्रवाशांच्या हितासाठी तातडीने निर्णय घेण्याची मागणी केली आहे. विशेषतः सणासुदीच्या काळात आणि सुट्यांच्या दिवसांत RAC तिकीटावर प्रवास करणाऱ्यांची संख्या मोठी असते. अशा वेळी अर्धी सीट आणि पूर्ण भाडे ही तफावत अधिक तीव्रतेने जाणवते.
सीट अर्धी असेल, तर भाडे पूर्ण का?
दरम्यान, या पार्श्वभूमीवर आता ‘सीट अर्धी असेल, तर भाडे पूर्ण का?’ हा प्रश्न पुन्हा ऐरणीवर आला आहे. RAC प्रवाशांना अर्धा रिफंड मिळणार का, याकडे देशभरातील लाखो रेल्वे प्रवाशांचे लक्ष लागले आहे. रेल्वे प्रशासन या मुद्द्यावर नेमका काय निर्णय घेते, याकडे सर्वांचे लक्ष केंद्रित झाले आहे.
