सुरक्षेच्या कारणास्तव निर्णय
भीमाशंकर विकास आराखड्याअंतर्गत मंदिर परिसरात सध्या भव्य सभामंडप, पायरी मार्ग आणि परिसराच्या सुशोभीकरणाचे काम युद्धपातळीवर सुरू आहे. या कामासाठी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणावर बांधकाम साहित्य, लोखंडी सळ्या आणि अवजड यंत्रसामग्री ठेवण्यात आली आहे. महाशिवरात्रीच्या अनेक भाविक दर्शनासाठी भीमाशंकरला येत असतात. एवढ्या मोठ्या गर्दीत बांधकाम साहित्यामुळे भाविकांच्या सुरक्षेला धोका निर्माण होऊ शकतो, ही बाब लक्षात घेऊन प्रशासनाने भाविकांच्या प्रवेशावर बंदी घातली आहे.
advertisement
आधीचा निर्णय बदलला
विशेष म्हणजे, विकासकामांसाठी मंदिर तीन महिन्यांसाठी बंद ठेवण्याचा निर्णय झाला तेव्हा महाशिवरात्रीच्या काळात मंदिर दर्शनासाठी उघडले जाईल, असे सांगण्यात आले होते. मात्र, कामाचा व्याप आणि भाविकांची संभाव्य गर्दी पाहता, सुरक्षेचा कोणताही धोका पत्करायला प्रशासन तयार नाही. त्यामुळे अखेर महाशिवरात्रीच्या मुख्य काळात मंदिर बंदच ठेवण्यावर शिक्कामोर्तब करण्यात आले आहे.
धार्मिक विधी सुरू राहणार
मंदिर भाविकांसाठी बंद असले तरी, महाशिवरात्रीनिमित्त होणारे सर्व धार्मिक विधी, पूजा आणि परंपरा मात्र खंडित होणार नाहीत. मंदिराचे पुजारी आणि मोजक्या कर्मचाऱ्यांच्या उपस्थितीत नियमित पूजा व महाशिवरात्रीचे विशेष विधी पार पडणार आहेत. भाविकांनी प्रशासनाला सहकार्य करावे आणि मंदिर परिसरात गर्दी करू नये, असे आवाहन करण्यात आले आहे.
