नेमकी घटना काय?
मिळालेल्या माहितीनुसार, जितू कैलास गायकवाड (वय ३५) हे सोमवारी रात्री अकराच्या सुमारास येलवाडी परिसरात चायनीज खाण्यासाठी गेले होते. त्या ठिकाणी काही तरुण मद्यप्राशन करत बसले होते. त्यापैकी एक तरुण जास्त नशेत असल्याने, माणुसकीच्या नात्याने जितू यांनी त्याला एका दुचाकीवर बसवून घरी पाठवून दिले. मात्र, ही मदत तिथे असलेल्या इतर नशेबाजांना रुचली नाही.
advertisement
मदतीचा बदला मारहाणीने
आपल्या मित्राला का पाठवले, या रागातून वैभव उदरभरे, विशाल उदरभरे, अविनाश जाधव आणि वैभव कोळेकर यांनी जितू गायकवाड यांना गाठले. संशयित आरोपींनी त्यांना शिवीगाळ करत मारहाण सुरू केली. या हल्ल्यात जितू यांच्या डोक्याला गंभीर दुखापत झाली असून त्यांचे डोके फोडण्यात आले. नशेत असलेल्या या तरुणांनी भररस्त्यात घातलेला हा राडा पाहून परिसरात भीतीचे वातावरण पसरले होते.
पोलिसांत गुन्हा दाखल
याप्रकरणी जितू गायकवाड यांनी दिलेल्या तक्रारीवरून वैभव आप्पासाहेब उदरभरे, विशाल आप्पासाहेब उदरभरे यांच्यासह चार जणांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. दुसरीकडे, आरोपींच्या बाजूनेही तक्रार देण्यात आल्याने पोलिसांनी परस्पर विरोधी गुन्हे नोंदवले आहेत. रात्रीच्या वेळी चायनीज सेंटर आणि हॉटेल परिसरात होणाऱ्या अशा नशेबाजांच्या राड्यामुळे सर्वसामान्यांच्या सुरक्षेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
