लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न
भारत आणि पाकिस्तान यांच्यातील हाय-व्होल्टेज मॅच ही नेहमीच आयसीसीसाठी कमाईचे मोठे साधन राहिली आहे. मात्र, यावेळी या महामुकाबल्यावर वादाचे ढग जमा झाले असून ही मॅच होणार की नाही, याबाबत मोठी चर्चा सुरू झाली आहे. बांगलादेशला टी-20 वर्ल्ड कपमधून बाहेर काढल्याच्या निषेधार्थ पाकिस्तानने 15 फेब्रुवारी रोजी होणाऱ्या भारताविरुद्धच्या मॅचवर बहिष्कार टाकण्याचा निर्णय जाहीर केला होता, ज्यामुळे क्रिकेट विश्वात खळबळ काहीशी माजली होती. अशातच पीसीबीने आयसीसीला लाडीगोडी लावण्याचा प्रयत्न केलाय.
advertisement
नियोजित पद्धतीने चर्चा सुरू
आयसीसीच्या एका अधिकाऱ्याने दिलेल्या माहितीनुसार, आता हे प्रकरण संघर्षाकडे न नेता संवादाच्या माध्यमातून सोडवण्यावर भर दिला जात आहे. आयसीसीने पाकिस्तानला विचारलं आहे की, ही परिस्थिती टाळण्यासाठी त्यांनी स्वतःहून काय प्रयत्न केले आहेत. सध्या आयसीसी आणि पीसीबी यांच्यात नियोजित पद्धतीने चर्चा सुरू असून या वादातून मार्ग काढण्यासाठी विविध पर्यायांचा विचार केला जात आहे, जेणेकरून चाहत्यांना ही हाय-व्होल्टेज मॅच बघायला मिळेल.
आयसीसीची पीसीबीला ताकीदही
आयसीसीने स्पष्ट शब्दांत पाकिस्तानला ठणकावून सांगितले की, ही परिस्थिती कोणत्याही प्रकारे नैसर्गिक आपत्तीच्या श्रेणीत येत नाही. जर पाकिस्तान संघ मैदानात उतरला नाही, तर आयसीसी त्यांच्याकडून कोट्यवधी रुपयांची नुकसानभरपाई वसूल करेल, अशी कडक ताकीदही देण्यात आली आहे. त्यामुळे पाकिस्तानची तंतरली असल्याचं पहायला मिळतंय.
'बॅक चॅनल' डिप्लोमसी
दरम्यान, या आर्थिक कारवाईच्या भीतीपोटी आता पाकिस्तान क्रिकेट बोर्डाचे धाबे दणाणले असून त्यांनी आपली आक्रमक भूमिका थोडी मऊ केली आहे. आयसीसीकडून कायदेशीर नोटीस मिळाल्यानंतर, पीसीबीने स्वतःहून जागतिक क्रिकेट संस्थेशी चर्चा करण्यासाठी पुढाकार घेतला आहे. ही मॅच न झाल्यास होणारे मोठे आर्थिक नुकसान टाळण्यासाठी आता दोन्ही बाजूंनी 'बॅक चॅनल' डिप्लोमसी आणि संवाद सुरू झाला असून एक सुवर्णमध्य काढण्याचे प्रयत्न सुरू आहेत.
