बोलता-बोलता खटकलं, काचेच्या ग्लासने मित्राचंच तोंड फोडलं, 60 टाके अन् 4 दिवस..., संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ
- Reported by:Apurva Pradip Talnikar
- Published by:Shankar Pawar
Last Updated:
Chhatrapati Sambhajinagar: सोबत जेवायला गेलेल्या मित्रासोबत बोलता-बोलता वाद निर्माण झाला. त्यानंतर मित्रानेच काचेच्या ग्लासने चेहरा फोडला.
छत्रपती संभाजीनगर: आर्थिक कारणावरून एका मित्रानेच तरुणावर हल्ला केला. काचेचा ग्लास तोंडावर मारल्याने तरुण गंभीर जखमी झाला असून त्याला 60 टाके पडले आहेत. ही घटना 15 डिसेंबर रोजी बीड बायपासवरील ‘चूल आंगण’ या हॉटेलमध्ये घडली. या प्रकरणात पुंडलिकनगर पोलीस ठाण्यात खुनाचा प्रयत्न केल्याचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
अमोल कल्याणकर नवथर (वय 35, रा. बीड बायपास) असे जखमी तरुणाचे नाव आहे. तर योगेश खरात, आदित्य कोल्हे, श्याम पोपळघट यांच्यासह अन्य दोन जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे. विशेष बाब म्हणजे, घटना घडली त्या वेळी पुंडलिकनगर पोलिस ठाण्यातील एक अंमलदार देखील हॉटेलमध्ये उपस्थित होता.
advertisement
तक्रारीनुसार, नवथर हे मित्रांसोबत जेवणासाठी हॉटेलमध्ये गेले असताना आरोपी योगेश खरात याने आक्षेपार्ह वक्तव्य केल्याने वादाला तोंड फुटले. त्यानंतर फोन करून त्याने साथीदारांना बोलावून घेतले. काही वेळातच चार ते पाच जणांनी एकत्र येत नवथरवर हल्ला केला. काचेच्या ग्लासने वार केल्याने नवथर यांच्या चेहरा व कपाळावर गंभीर जखमा झाल्या आणि ते जागीच बेशुद्ध पडले.
advertisement
नवथर यांच्या चेहऱ्यावर तब्बल 60 टाके पडले असून चार दिवसांनंतर त्यांना शुद्ध आली. त्यानंतर दिलेल्या तक्रारीवरून पोलिसांनी खुनाच्या प्रयत्नाचा गुन्हा नोंदवला. घटनेनंतर आरोपी फरार झाले असून उपनिरीक्षक रेशीम कोळेकर पुढील तपास करीत आहेत.
दरम्यान, बीड बायपास परिसरात मोठ्या प्रमाणावर अवैध हॉटेल, ढाबे आणि दारूविक्री सुरू असल्याचा गंभीर आरोप स्थानिकांकडून करण्यात येत आहे. देवळाई चौक ते झाल्टा फाटा दरम्यान अनेक हॉटेल्स व बार असून, मध्यरात्री उशिरापर्यंत खुलेआम मद्यविक्री व मद्यसेवन सुरू असते. त्यामुळे या भागात गुन्हेगारी वाढत असल्याचे चित्र आहे.
view commentsLocation :
Aurangabad,Maharashtra
First Published :
Dec 24, 2025 9:34 AM IST
मराठी बातम्या/महाराष्ट्र/छ. संभाजीनगर/
बोलता-बोलता खटकलं, काचेच्या ग्लासने मित्राचंच तोंड फोडलं, 60 टाके अन् 4 दिवस..., संभाजीनगरच्या घटनेनं खळबळ










