advertisement

शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! असं करणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य

Last Updated:

Agriculture News : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला आहे.

Agriculture News
Agriculture News
मुंबई : राज्यातील शेतकरी आत्महत्यांचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महाराष्ट्र सरकारने एक महत्त्वाचा निर्णय घेतला असून, यासाठी स्वतंत्र ‘शेतकरी आत्महत्या प्रतिबंध टास्क फोर्स’ स्थापन करण्यात आला आहे. कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी परिपत्रकाद्वारे या निर्णयाची माहिती दिली. शेतकऱ्यांच्या समस्यांकडे मानसिक, सामाजिक, आर्थिक आणि हवामान बदलाच्या पार्श्वभूमीवर एकत्रितपणे पाहण्याचा या कृती दलाचा उद्देश आहे. अशा प्रकारची समर्पित यंत्रणा उभारणारे महाराष्ट्र हे देशातील पहिले राज्य ठरले आहे.
बहुविभागीय समितीला जबाबदारी
या टास्क फोर्सचे नेतृत्व विस्तार व प्रशिक्षण विभागाचे संचालक रफिक नाईकवाडी करणार आहेत. त्यांच्या अध्यक्षतेखाली सुनील बोरकर, उदय देशमुख, गणेश घोरपडे, जीवन सुंदे, नंदकिशोर नाईनवाड, सत्यनित शितोळे आणि सोनाली शिळकर या वरिष्ठ अधिकाऱ्यांचा समावेश करण्यात आला आहे. या समितीत विविध विभागांचा समन्वय साधून काम केले जाणार आहे.
मानसिक आरोग्य तज्ज्ञांचा समावेश
या कृती दलात केवळ शासकीय अधिकारीच नाहीत, तर शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर प्रत्यक्ष काम करणारे तज्ज्ञही सहभागी करण्यात आले आहेत. ‘शिवार फाऊंडेशन’च्या माध्यमातून संशोधन करणारे कृषी समाजशास्त्रज्ञ डॉ. विनायक हेगाणा आणि महिला शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर अभ्यास करणाऱ्या मानसोपचारतज्ज्ञ डॉ. सुष्टी डोईजड यांची विशेष सदस्य म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे. त्यामुळे या टास्क फोर्सच्या कामकाजाला मानवी संवेदना आणि वैज्ञानिक दृष्टिकोन मिळणार आहे.
advertisement
नव्या यंत्रणेमुळे शेतकऱ्यांना दिलासा
या टास्क फोर्सच्या स्थापनेमुळे शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी सुरू असलेल्या प्रयत्नांना अधिक बळ मिळणार आहे. शेतकऱ्यांच्या मानसिक तणावासह आर्थिक अडचणी, सामाजिक दबाव आणि हवामान बदलामुळे निर्माण होणाऱ्या संकटांवर प्रभावी उपाययोजना राबवण्यात येणार आहेत. या नव्या यंत्रणेचा लाभ प्रत्यक्ष शेतकऱ्यांपर्यंत पोहोचेल, अशी अपेक्षा व्यक्त केली जात आहे.
हवामान बदल आणि आर्थिक ताण मोठे कारण
राज्यात विविध शेतकरी कल्याणकारी योजना राबवण्यात येत असल्या तरी हवामान बदलामुळे वाढणाऱ्या नैसर्गिक आपत्ती, पिकांचे नुकसान, वाढता उत्पादन खर्च, कर्जाचा भार आणि बाजारातील अस्थिरता यामुळे शेतकरी अजूनही संकटात सापडत आहेत. याचा थेट परिणाम शेतकऱ्यांच्या मानसिक आरोग्यावर होत असल्याचे विभागाने नमूद केले आहे.
advertisement
आपत्तीपूर्व ते आपत्तीनंतर मदतीचा आराखडा
या टास्क फोर्सच्या माध्यमातून आपत्तीपूर्व, आपत्तीच्या काळात आणि आपत्तीनंतर शेतकऱ्यांना शेतीविषयक, आर्थिक, सामाजिक आणि मानसिक अशा चतुःसूत्री दृष्टिकोनातून मदत केली जाणार आहे. शेतकऱ्यांच्या अडचणी एकात्मिक पद्धतीने हाताळून दीर्घकालीन व शाश्वत उपाययोजना उभारण्याचा सरकारचा मानस आहे.
केवळ भरपाई नव्हे, तर प्रतिबंधावर भर
कृषी आयुक्त सुरज मांढरे यांनी स्पष्ट केले की, शेतकरी आत्महत्या हा प्रश्न केवळ आत्महत्येनंतर आर्थिक मदत देण्यापुरता मर्यादित नाही. शेतकऱ्यांना आधीच सक्षम करणे, त्यांचे उत्पन्न वाढवणे, जोखीम कमी करणे आणि मानसिक आधार देणे हे अधिक महत्त्वाचे आहे. यासाठी कृषी विभागातील विविध योजना इतर विभागांशी समन्वय साधून अधिक प्रभावीपणे राबवण्यात येणार आहेत.
view comments
मराठी बातम्या/कृषी/
शेतकरी आत्महत्या रोखण्यासाठी राज्य सरकारचा मोठा निर्णय! असं करणारं महाराष्ट्र ठरलं देशातलं पहिलं राज्य
Next Article
advertisement
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान; सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय, ज्याचा कोणी विचारच केला नव्हता
सोन्यापेक्षाही भारी अन् मौल्यवान, सर्वात हुशार एक्सपर्ट सांगितला असा पर्याय...
  • सोनं विसरा, हा पर्याय पाहा

  • गुंतवणुकीचा सर्वात मोठा 'गेम' उघड

  • एका निर्णयाने तुमचं नशीब बदलू शकतं

View All
advertisement