निर्णय का घेतला?
कंपनीच्या मते, कच्च्या मालाच्या किमतीत झालेली वाढ आणि परिचालन खर्चातील वाढ ही दरवाढीमागची प्रमुख कारणे आहेत. नवीन आर्थिक वर्षाच्या सुरुवातीला वाहन आणि कृषी उपकरण उत्पादकांकडून दरवाढीचे निर्णय घेतले जात आहेत, त्याच पार्श्वभूमीवर एस्कॉर्ट्स कुबोटानेही हा निर्णय घेतला आहे.
विक्रीत मोठी वाढ
दरम्यान, दरवाढीच्या पार्श्वभूमीवरही कंपनीच्या विक्रीत सकारात्मक चित्र दिसून आले आहे. मार्च २०२६ मध्ये कंपनीने एकूण १२,११९ ट्रॅक्टरची विक्री केली, जी मागील वर्षीच्या ११,३७४ युनिट्सच्या तुलनेत ६.६ टक्क्यांनी अधिक आहे. देशांतर्गत बाजारात कंपनीची कामगिरी अधिक मजबूत राहिली असून ११,५८२ युनिट्सची विक्री झाली आहे, जी गेल्या वर्षाच्या तुलनेत ७.५ टक्क्यांनी जास्त आहे. यावरून ग्रामीण भागात ट्रॅक्टरची मागणी अजूनही स्थिर आणि मजबूत असल्याचे स्पष्ट होते.
advertisement
ट्रॅक्टरची वाढती मागणी
ग्रामीण भागातील वाढती मागणी आणि रब्बी पिकांच्या कापणीचा हंगाम यामुळे ट्रॅक्टर विक्रीत वाढ झाली आहे. काही भागात पावसामुळे कापणीला विलंब झाला असला तरी पिकांची स्थिती चांगली असल्याने शेतकऱ्यांची यंत्रसामग्रीवरील गुंतवणूक वाढत आहे. यासोबतच देशातील जलाशयांमधील पाण्याची पातळी सुधारल्यामुळे सिंचन व्यवस्था मजबूत झाली आहे, ज्यामुळे शेतकऱ्यांचा आत्मविश्वास वाढला असून ट्रॅक्टर खरेदीला चालना मिळाली आहे.
मात्र, निर्यातीच्या बाबतीत कंपनीला काही प्रमाणात घसरणीचा सामना करावा लागला आहे. मार्च २०२६ मध्ये कंपनीने ५३७ ट्रॅक्टर निर्यात केले, जे मागील वर्षीच्या ५९९ युनिट्सपेक्षा कमी आहे. जागतिक बाजारातील अनिश्चितता आणि परिस्थितीमुळे ही घट झाल्याचे मानले जात आहे.
आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धाचा परिणाम
पुढील काळातही काही आव्हाने कायम राहू शकतात, असे संकेत कंपनीने दिले आहेत. आंतरराष्ट्रीय परिस्थिती आणि युद्धाच्या तणावामुळे खतांच्या पुरवठ्यावर परिणाम होण्याची शक्यता असून त्याचा परिणाम आगामी खरीप हंगामावर होऊ शकतो. यामुळे शेतीसंबंधित गुंतवणूक आणि ट्रॅक्टरची मागणीही प्रभावित होण्याची शक्यता आहे.
