आपल्या आवाजाने जगाला मंत्रमुग्ध करणाऱ्या या महान गायिकेला लोक प्रेमाने लतादीदी म्हणायचे. भारत सरकारने त्यांना देशातील सर्वोच्च सरकारी पुरस्कार 'भारतरत्न' देऊन गौरवलं होतं. कोरोना व्हायरसमुळे अनेकांना आपल्या प्रियजनांना गमवावं लागलं, याच कोरोनाने लतादीदींना आपल्यातून हिरावून नेलं. लतादीदींना कोरोनाचा संसर्ग झाला होता, त्यामुळे त्यांच्यावर मुंबईच्या ब्रीच कँडी रुग्णालयात उपचार सुरू होते, त्यातच 6 फेब्रुवारी 2022 रोजी कोरोनामुळे निर्माण झालेल्या आरोग्याशी संबंधित गुंतागुंतीमुळे त्यांनी जगाचा निरोप घेतला. लतादीदींबद्दल इतके किस्से आहेत, की सांगण्यात आणि ऐकण्यात बरेच दिवस निघून जातील. त्यांच्याशी संबंधित काही खास गोष्टी आज आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.
advertisement
राजकुमाराच्या प्रेमात पडलेल्या लतादीदी, करायचं होतं लग्न;का अपूर्ण राहीलं स्वप्न
पंडित दीनानाथ मंगेशकर हे मराठी संगीतकार, शास्त्रीय गायक आणि रंगभूमीवरचे अभिनेते होते. पंडित दीनानाथ मंगेशकर यांची सर्वांत मोठी मुलगी म्हणजे लतादीदी. लहान असतानाच लतादीदींनी लावायला खूप कठीण सूर सहज लावले होते, ते पाहून त्यांच्या वडिलांच्या लक्षात आलं होतं, की ही मुलगी एक दिवस मोठी गायिका होईल. त्यांनी लतादीदींना गाणी शिकवायला सुरुवात केली होती, पण अचानक दीनानाथ मंगेशकर यांचं निधन झालं आणि आई व लहान भावंडांच्या पालनपोषणाची जबाबदारी छोट्या लतादीदींवर येऊन पडली. अशा परिस्थितीत कुटुंबाच्या पालनपोषणासाठी लतादीदींना चित्रपट आणि स्टेजवर काम करावं लागलं. लता मंगेशकर यांचं बालपण खूप संघर्षमय होतं.
राजकुमाराच्या प्रेमात पडलेल्या लतादीदी, करायचं होतं लग्न;का अपूर्ण राहीलं स्वप्न
'आएगा आनेवाला' या गाण्यानं बदललं नशीब
काही काळानंतर लता मंगेशकर कुटुंबासह मुंबईत आल्या. इथे त्यांना अभिनयाची संधी मिळाली, त्यामुळे त्यांनी गायन सोडून अभिनयाला सुरुवात केली. मीडिया रिपोर्ट्सनुसार, लतादीदींनी जवळपास 8 हिंदी व मराठी चित्रपटांमध्ये काम केलं होतं. लतादीदींना अभिनय करायला आवडायचं नाही, पण त्यांच्यावर कुटुंबाची जबाबदारी होती, त्यामुळे त्यांना अभिनय करावा लागला.अभिनय करताना लतादीदींनी गाण्याची आवड जोपासली. चित्रपटांमध्ये गाणी गायला मिळतील, यासाठी प्रयत्नही सुरू ठेवले. अखेर 1949 मध्ये त्यांच्या प्रयत्नांना यश आलं आणि त्यांना 'महल' चित्रपटातील 'आएगा आनेवाला' हे हिंदी गाणं गाण्याची संधी मिळाली. हे लतादीदींचं पहिलं हिंदी गाणं होतं.
लतादीदींनी हे गाणं अप्रतिम गायलं होतं, या गाण्याने चित्रपटाची मुख्य अभिनेत्री मधुबालाच्या सौंदर्यात भर घालण्याचं काम केलं. दरम्यान, तो चित्रपट आणि लतादीदींनी गायलेलं पहिलं हिंदी गाणं दोन्ही सुपर-डुपर हिट झालं आणि त्यानंतर लतादीदींनी कधीच मागे वळून पाहिलं नाही. 1949 पासून सुरू झालेला त्यांचा गायनाचा प्रवास हा अगदी आयुष्याच्या शेवटच्या टप्प्यापर्यंत सुरू होता. लतादीदींच्या बहिणी म्हणजे विख्यात गायिका आशा भोसले, उषा मंगेशकर, मीना मंगेशकर-खडीकर आणि भाऊ हृदयनाथ मंगेशकर यांनीही पुढे संगीतामध्येच आपलं करिअर केलं.
चाहते लतादीदींना देवी सरस्वतीचा अवतार मानत
लता मंगेशकर या भारतातील सर्वांत प्रसिद्ध गायिका होत्या आणि लोक त्यांना माता सरस्वतीचा अवतार मानायचे. लतादीदींनी हिंदी, मराठी, बंगाली अशा 30 हून अधिक भाषांमध्ये गाणी गात वेगळा विक्रम केला. त्यांनी 1942 साली 'किती हसाल' या चित्रपटात त्यांनी पहिलं मराठी गाणं गायलं होतं. याशिवाय 1958 ते 1994 पर्यंत अनेक फिल्मफेअर पुरस्कार, राष्ट्रीय पुरस्कार, महाराष्ट्र शासन पुरस्कार, पद्मविभूषण, दादासाहेब फाळके पुरस्कार, फिल्मफेअर लाइफ टाईम अचिव्हमेंट पुरस्कार, राजीव गांधी पुरस्कार अशा अनेक पुरस्कारांनी त्यांना सन्मानित करण्यात आलं होतं.
लतादीदी अनवाणी रेकॉर्ड करायच्या गाणी
संगीताला देवाची पूजा मानणाऱ्या लतादीदी नेहमी गाणं रेकॉर्ड कराताना अनवाणी असायच्या म्हणजे पायात काहीही घालत नसत. गायनाबरोबरच लतादीदींना क्रिकेटचीही प्रचंड आवड होती. लतादीदी या एकमेव जिवंत व्यक्ती होत्या ज्यांच्या नावाने पुरस्कार दिले जायचे. लता मंगेशकर यांनी आनंदघन या नावाने संगीत दिलं तसंच चित्रपटांची निर्मितीही केली होती, याबद्दल फार लोकांना माहीत नाही.
