मराठी चित्रपटसृष्टीचे 'एव्हरग्रीन' अभिनेते सचिन पिळगावकर गेल्या तीन दशकांहून अधिक काळ प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहेत. मात्र, मागील काही वर्षांपासून त्यांनाही ट्रोलिंगला सामोरे जावे लागले आहे. अभिनय, दिग्दर्शन, गायन आणि नृत्य अशा अष्टपैलू व्यक्तीमत्त्वामुळे त्यांनी आपली वेगळी ओळख निर्माण केली आहे. मात्र, अलीकडच्या काळात सोशल मीडियावर कलाकारांना ज्या प्रकारे ट्रोल केले जाते, त्यावर सचिन पिळगावकर यांनी रेडिओ सिटीला दिलेल्या मुलाखतीत रोखठोक भाष्य केले आहे.
advertisement
दुसऱ्यांच्या तालावर जगणार नाही
सध्याच्या काळात युगात व्यक्त होताना मर्यादा पाळाव्या लागतात, असे मत त्यांनी व्यक्त केले. सचिन पिळगावकर मुलाखतीत म्हणाले की, "आजचा काळ असा आहे की तुम्हाला खूप विचारपूर्वक व्यक्त व्हावे लागते. पण याचा अर्थ असा मुळीच नाही की, तुम्ही इतरांच्या सांगण्यानुसार जगावे. प्रेक्षक म्हणून तुम्हाला आमचा सिनेमा आवडला नाही, तर त्यावर टीका करण्याचा तुम्हाला पूर्ण अधिकार आहे. मात्र, आमच्या वैयक्तिक आयुष्यावर बोलण्याचा अधिकार कोणालाही नाही. अशा लोकांना समजावण्यात वेळ वाया घालवण्यात काहीच अर्थ नसल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
आमच्यामुळे त्यांना झोप येत असेल तर...
ट्रोलिंगकडे सकारात्मकतेने कसे पाहावे, हे सांगताना सचिन पिळगावकर यांनी बॉलिवूडचा किंग खान शाहरुखचे एक उदाहरण दिले. "शाहरुखला एकदा विचारण्यात आले होते की, तुला ट्रोलिंगचा त्रास होत नाही का? त्यावर शाहरुखने दिलेले उत्तर खूपच प्रेरणादायी होते. शाहरुख म्हणालेला, 'ज्या माणसाने आयुष्यात काहीच केले नाही, तो माणूस जर मला ट्रोल करून रात्री शांत झोपू शकत असेल, तर त्याच्या सुखाचे कारण मी आहे याचा मला आनंदच आहे'," असे सचिन पिळगावकर यांनी सांगितले.
प्रेम करणाऱ्यांची संख्या जास्त
"जोपर्यंत माझ्यावर प्रेम करणाऱ्यांची संख्या ट्रोल करणाऱ्यांपेक्षा जास्त आहे, तोपर्यंत मला काळजी करण्याची गरज नाही. ज्या दिवशी प्रेम करणाऱ्यांची संख्या कमी होईल, तेव्हा खऱ्या अर्थाने काळजी वाटू लागेल," असे म्हणत त्यांनी आपल्या चाहत्यांप्रती कृतज्ञता व्यक्त केली.
