नेमकी घटना काय?
प्रवीण जगदीश मायाचारी (वय २१) असं मृत तरुणाचं नाव आहे. प्रवीण हा बीबीएच्या (BBA) द्वितीय वर्षात शिक्षण घेत होता. मिळालेल्या माहितीनुसार, सात दिवसांपूर्वी प्रवीणचा मोबाईल फोन चुकून फुटला होता. नवीन मोबाईल घेण्यासाठी त्याने आपल्या आई-वडिलांकडे पैशांचा तगादा लावला होता. मात्र, घराची आर्थिक ओढाताण लक्षात घेता आई-वडिलांनी त्याला समजावलं होतं. "सध्या पैसे नाहीत, जसे पैसे येतील तसा तुला नवीन मोबाईल घेऊन देऊ" असं घरच्यांनी सांगितलं होतं. मात्र त्याने मोबाइल घेऊन न दिल्याच्या कारणातून आत्महत्या केली.
advertisement
प्रवीणचे वडील एक छोटेसे इलेक्ट्रॉनिक्सचं दुकान चालवतात आणि त्यावरच त्यांच्या कुटुंबाचा उदरनिर्वाह चालतो. ३ एप्रिल रोजी रात्री नेहमीप्रमाणे घरातील सर्वांचे जेवण झाले. रात्री १० वाजेच्या सुमारास प्रवीण आपल्या खोलीत झोपण्यासाठी गेला. दुसऱ्या दिवशी सकाळी ७:३० वाजले तरी प्रवीण खोलीबाहेर आला नाही, म्हणून आईने त्याला आवाज दिला. बराच वेळ आवाज देऊनही आतून कोणताही प्रतिसाद मिळाला नाही.
अखेर मनात शंका आल्याने वडिलांनी खोलीचा दरवाजा तोडला, तेव्हा समोरचं दृश्य पाहून त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली. प्रवीणने खोलीत गळफास घेऊन आपली जीवनयात्रा संपवली होती. घटनेची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली. या प्रकरणी मोहोळ शहर पोलीस ठाण्यात पालकांनी आपला जबाब नोंदवला आहे. पोलीस या घटनेचा पुढील तपास करत आहेत. तरुणाने मोबाइल न दिल्याच्या कारणातून आत्महत्या केली ? यामागे इतर काही कारण आहे? याचा तपास पोलीस करत आहेत.
