ही घटना २८ मार्च रोजी रात्रीच्या सुमारास घडली. या प्रकरणी पोलिसांनी त्याच रात्री पाच आरोपींना अटक देखील केली होती. मात्र पोलिसांकडून आरोपींची नावं जाहीर केली जात नव्हती. यामुळे संतप्त नागरिक आणि विविध संघटनांमध्ये मोठा असंतोष निर्माण झाला होता. अखेर घटनेच्या आठ दिवसानंतर पोलिसांनी या पाचही आरोपींची नावं जाहीर केली आहेत.
advertisement
नेमकी घटना काय होती?
२८ मार्च रोजी रात्री ८ ते साडेनऊच्या दरम्यान ही संतापजनक घटना घडली. पीडित तरुणी आणि तिचा मित्र रस्त्याने जात असताना पाच आरोपींनी त्यांना अडवले. त्यानंतर आरोपींनी तरुणीच्या मित्राला दोरखंडाने बांधून त्याला अमानुष मारहाण केली. यानंतर आरोपींनी तरुणीवर पाशवी अत्याचार केला. या घटनेने परिसरात एकच खळबळ उडाली होती.
आरोपींची नावे आणि अटकेची कारवाई
पोलिसांनी घटनेच्या रात्रीच पाचही आरोपींना शिताफीने अटक केली होती. मात्र, तपासाच्या कारणास्तव किंवा इतर कारणांमुळे पोलीस आरोपींची नावे उघड करत नव्हते. यामुळे अमरावती शहरात तीव्र जनक्षोभ उसळला होता. जनआक्रोशानंतर अखेर पोलिसांनी आरोपींची नावे जाहीर केली आहेत. ईश्वर पांडुरंग मरसकोल्हे (वय ३४), दीपक मरसकोल्हे (वय २९), प्रमोद नारायण वाघाडे (वय ३९), शुभम उर्फ सोनू नारायण वाघाडे (वय २८) आणि
उमेश बेनीराम भोयर अशी अटक केलेल्या आरोपींची नावं आहेत. या पाचही आरोपींना शनिवारी कायदेशीर प्रक्रिया पूर्ण करून जिल्हा कारागृहात रवाना करण्यात आलं आहे.
फास्टट्रॅक कोर्टात खटला चालवण्याची मागणी
या अमानवीय कृत्यामुळे जिल्हाभरात संतापाची लाट उसळली आहे. विविध सामाजिक संघटना आणि नागरिक रस्त्यावर उतरून आरोपींना कडक शिक्षा देण्याची मागणी करत आहेत. "हे प्रकरण अत्यंत गंभीर असून, यावर फास्टट्रॅक कोर्टात सुनावणी व्हावी आणि या नराधमांना फाशीची शिक्षा सुनावण्यात यावी," अशी आक्रमक मागणी जोर धरत आहे. घटनेचा पुढील तपास सुरू आहे.
