२९ मे रोजी सकाळी ८:३० वाजता उत्तर-पश्चिम बंगालच्या उपसागरात कमी दाबाचा पट्टा तयार झाला आहे. त्याचा परिणाम आसपासच्या राज्यांवर होणार आहे. तर दुसरीकडे कोकण-गोवा, विदर्भात २९ आणि ३० मे रोजी पावसाची शक्यता आहे. त्यानंतर या भागात पावसाचा जोर थोडा कमी होईल. पुढील २४ तास फारसा बदल होणार नाही, परंतु नंतर तापमानात २ ते ४ अंशांनी घट होण्याची शक्यता आहे. मध्य भारतात पुढील तीन दिवसांत तापमान २ ते ३ अंशांनी वाढू शकते.
advertisement
अकोला, अमरावती, बुलढाणा, भंडारा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, चंद्रपूर, वाशीम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्ये पुढचे चार दिवस मुसळधार पावसाचा इशारा देण्यात आला आहे. विजांचा कडकडाट, ढगांचा गडगडाट होईल. या दरम्यान 50 किमी ताशी वेगाने वारे वाहतील. वादळी वाऱ्यांमुळे पावसाचा जोर राहील असा प्राथमिक अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. पुढचे तीन ते चार दिवस ही स्थिती राहील, त्यानंतर पाऊस थोडा ब्रेक घेईल असा अंदाज वर्तवला आहे.
मागच्या 48 तासात झालेल्या पावसानं कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि काही ग्रामीण भागातील गावांना अक्षरश: झोडपून काढलं आहे. काही ठिकाणी गावांचा संपर्क तुटला आहे. मुंबई, ठाणे, उपनगरात पावसानं विश्रांती घेतली आहे. अधून मधून एक सर येते. नवी मुंबई, पनवेल, कल्याण डोंबिवली परिसरातही पावसाने बऱ्यापैकी विश्रांती घेतली होती. आजही या भागांमध्ये हवामान विभागाने पावसाच्या हलक्या सरींचा इशारा दिला आहे.
बीड जिल्ह्यात पावसाचा धुमाकूळ पाहायला मिळाला आहे. पावसामुळे वडवणी तालुक्यातील सुरडी थोट येथील नदीला पूर आल्याने 15 गावांचा संपर्क तुटला आहे. अमरावतीच्या तिवसा शहरात जोरदार पावसाने हजेरी लावली. वेळेआधी महाराष्ट्रात मान्सून दाखल झाला. मात्र त्याचा आता वेग मंदावलाय. त्यामुळे विदर्भात मान्सून लांबण्याची शक्यता वर्तवण्यात आलीय. धाराशिव जिल्ह्याला मुसळधार पावसानं झोडपलं. भूम, वाशी आणि तुळजापूर तालुक्यात जोरदार पाऊस झाला. अवघ्या अर्ध्या तासाच्या पावसानं रस्ते पाण्याखाली गेलेत. धाराशिवमध्ये मुसळधार पावसाने हजेरी लावली. जोरदार पावसामुळे रस्त्यांना नदीचं स्वरुप आलं. त्यामुळे नागरिकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.
