राज्यातील अनेक जिल्ह्यांमध्ये मेघगर्जनेसह जोरदार वारे आणि मध्यम ते मुसळधार पावसाची शक्यता आहे. काही जिल्ह्यांमध्ये अतिवृष्टीचा धोका कायम आहे. पालघर, ठाणे आणि मुंबई या जिल्ह्यांमध्ये आज (हलका ते मध्यम स्वरूपाचा) वादळी पाऊस होईल असा अंदाज वर्तवला आहे. मात्र, रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांमध्ये आजही जोरदार ते अतिजोरदार पाऊस पडण्याची शक्यता आहे. मागच्या 48 तासात रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यात मुसळधार पावसाचं धुमशान सुरू आहे. पुढचे दोन दिवस पाऊस सुरूच राहील असा अंदाज वर्तवला आहे.
advertisement
उत्तर महाराष्ट्रातील धुळे, नंदुरबार आणि जळगाव जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस आणि मेघगर्जना होण्याची शक्यता आहे. नाशिक आणि नाशिकच्या घाटमाथ्यावरही जोरदार वाऱ्यांसह पावसाचा अंदाज वर्तवण्यात आला आहे. मध्य महाराष्ट्रातील पुणे आणि अहमदनगर जिल्ह्यांमध्ये मध्यम ते जोरदार पावसाची शक्यता आहे. पुणे घाटमाथ्यावर आणि कोल्हापूर जिल्ह्याच्या काही भागांमध्ये मुसळधार पाऊस पडू शकतो. सातारा जिल्ह्यातही जोरदार पावसाचा अंदाज आहे. सांगली आणि सोलापूर जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस अपेक्षित आहे.
मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर आणि जालना जिल्ह्यांमध्ये हलका ते मध्यम पाऊस पडण्याची शक्यता आहे. परभणी, बीड, हिंगोली, नांदेड, लातूर आणि धाराशिव जिल्ह्यांमध्येही वादळी वाऱ्यांसह पावसाचा अंदाज आहे. विदर्भातील अकोला, अमरावती, भंडारा, बुलढाणा, चंद्रपूर, गडचिरोली, गोंदिया, नागपूर, वर्धा, वाशिम आणि यवतमाळ या जिल्ह्यांमध्येही मेघगर्जनेसह हलका ते मध्यम स्वरूपाचा पाऊस पडण्याची शक्यता आहे.
हवामान विभागाने नागरिकांना सतर्क राहण्याचे आणि आवश्यक ती खबरदारी घेण्याचे आवाहन केले आहे. जोरदार वारे आणि मुसळधार पावसामुळे वाहतूक आणि जनजीवनावर परिणाम होऊ शकतो. त्यामुळे नागरिकांनी अनावश्यक घराबाहेर पडणे टाळावे आणि सुरक्षित ठिकाणी आश्रय घ्यावा. विजांच्या कडकडाटादरम्यान झाडांखाली किंवा विद्युत खांबांजवळ उभे राहू नये. मच्छीमारांना समुद्रात न जाण्याचा सल्ला देण्यात आला आहे.
