मुंबई आणि कोकणात उन्हाचा तडाखा
हवामान खात्याच्या ताज्या आकडेवारीनुसार, राज्याच्या किनारपट्टी भागात तापमानाचा पारा सरासरीपेक्षा वर गेला आहे. मुंबईत कमाल तापमान ३४.५ ते ३५ अंश सेल्सिअस दरम्यान नोंदवले जात आहे. रत्नागिरीत तर पार ३६ अंशांपर्यंत पोहोचला आहे. कोकण किनारपट्टीवर दक्षिण-पूर्व दिशेकडून येणाऱ्या वाऱ्यांमुळे आर्द्रता वाढली असून, दुपारी उन्हाचे चटके आणि उकाडा असह्य होऊ लागला आहे.
advertisement
उत्तरेतील वाऱ्यांचा जोर ओसरला
गंगा नदीच्या खोऱ्यातून येणारे थंड वारे आता कमकुवत झाले आहेत. उत्तर भारतात जरी ९ आणि १० फेब्रुवारीला पहाडी भागात बर्फवृष्टीची शक्यता असली, तरी त्याचा मोठा प्रभाव महाराष्ट्रावर पडणार नाही. उलट, वाऱ्यांची दिशा बदलल्यामुळे किमान तापमानात वाढ झाली आहे. महाराष्ट्रात आता बहुतांश ठिकाणी रात्रीचे तापमान १० ते १२ अंशांच्या वर गेले असून कडाक्याची थंडी आता इतिहास जमा होण्याच्या मार्गावर आहे.
विदर्भ आणि मराठवाड्यात काय स्थिती?
विदर्भ, मराठवाडा आणि पश्चिम महाराष्ट्रात हवामान पूर्णपणे कोरडे राहणार आहे. पुणे, नाशिक आणि छत्रपती संभाजीनगरमध्ये दिवसा कडक ऊन आणि रात्री संमिश्र वातावरण राहील. १० आणि ११ फेब्रुवारी रोजी तापमानात १ ते २ अंशांची किरकोळ घट होऊ शकते, मात्र ही थंडी फार काळ टिकणारी नसेल.
शेतकऱ्यांसाठी सूचना
पुढील एक आठवडा महाराष्ट्रात पावसाची कोणतीही शक्यता नाही. हवामान शुष्क आणि उष्ण राहणार असल्याने रब्बी पिकांना पाण्याची गरज भासू शकते. वाढत्या तापमानामुळे पिकांमधील ओलावा कमी होण्याची शक्यता असल्याने शेतकऱ्यांनी सिंचनाचे नियोजन करावे, असा सल्ला हवामान तज्ज्ञांनी दिला आहे.
