कदम कुटुंबाचा प्रभाव असलेला गट
भडगाव गट हा शिवसेनेचे ज्येष्ठ नेते आमदार रामदास कदम, गृहराज्यमंत्री योगेश कदम तसेच शिवसेनेचे उपनेते संजय कदम यांचा प्रभावक्षेत्र म्हणून ओळखला जातो. कदम कुटुंबाच्या राजकीय वर्चस्वामुळे हा गट शिवसेनेचा बालेकिल्ला मानला जात होता. त्यामुळे येथे झालेली निवडणूक ही केवळ स्थानिक पातळीवरील नव्हती, तर प्रतिष्ठेची थेट लढत ठरली.
advertisement
अजय बिरवटकरांचा विजय
या गटातून राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार अजय बिरवटकर रिंगणात होते. ते राष्ट्रवादीचे ज्येष्ठ नेते सुनील तटकरे यांचे सख्खे मेहुणे असल्याने या निवडणुकीला अधिकच राजकीय रंग चढला होता. अत्यंत चुरशीच्या आणि अटीतटीच्या झालेल्या या लढतीत बिरवटकर यांनी विजय मिळवत शिवसेनेला मोठा धक्का दिला आहे.
विजय मिरवणुकीत बॅनरने डिवचलं
विजयानंतर जल्लोष करताना काही कार्यकर्त्यांनी “कैसा हराया” असे मजकूर असलेले बॅनर झळकवले.या बॅनरच्या माध्यमातून विरोधकांना डिवचण्याचा प्रयत्न केला आहे.सध्या सोशल मीडियावर हे फोटो मोठ्या प्रमाणात व्हायरल होत आहेत.
राजकीय परिणाम काय?
भडगाव गटातील हा निकाल आगामी राजकीय समीकरणांसाठी महत्त्वाचा मानला जात आहे. कदम कुटुंबाच्या प्रभाव असलेल्या भागात राष्ट्रवादीला मिळालेला विजय हा तटकरे गटासाठी बळकटी देणारा ठरला आहे.
रत्नागिरीतील राजकीय बलाबल
रत्नागिरी-सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघाचे खासदार नारायण राणे (भाजप) हे जिल्ह्यातील प्रमुख राजकीय नेतृत्व मानले जाते. आमदारांमध्ये उदय सामंत, योगेश कदम, शेखर निकम, किरण सामंत आणि भास्कर जाधव यांचा प्रभाव विविध भागांत दिसून आला.
